बंद पोलीस चौकी सुरु करण्याची साकुर ग्रामस्थांची मागणी

नायक वृत्तसेवा, साकुर 
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील  पोलिस चौकी केवळ नावालाच असुन ही पोलीस चौकी नेहमीच बंद राहत असल्याने येथील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे बंद पोलीस चौकी तात्काळ सुरु करण्याची मागणी साकूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 एकट्या साकूरची लोकसंख्या चौदा हजाराहून अधिक असून येथील बाजारपेठ मोठी आहे. प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात  शालेय विद्यार्थी  मोठया प्रमाणावर शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न येतो. बुधवारी आठवडे बाजार असल्यामुळे शेळ्या, मेंढ्या खरेदी विक्रीसाठी नागरिक आणि व्यापारी जिल्ह्यातून येतात.
साकूर येथे व्यापारी, व्यावसायिक मोठया प्रमाणावर असून या भागात पोलीस चौकीची  गरज आहे. काही महिन्यापूर्वी साकूर गावात भरदिवसा पिस्तूल दाखवत हवेत गोळीबार करत कान्हा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला होता. गेल्या काही दिवसात  येथील पटेल गल्लीत दोन बंद घरे चोरट्यानी फोडून पोबारा केला. त्याच दुसऱ्या दिवशी रात्री  बिरोबानगर मधील तीन घरे पुन्हा फोडली आणि घरातील सामानाची उचकापाचक करत धूम ठोकली. साकूर भागात चोऱ्या नेहमीच होताना दिसत असून या गावात अवैद्य धंदे जोमात सुरु आहेत.याकडे पोलीस कानाडोळा करत असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोधरी वाढले असून ग्रामस्थ मात्र अस्वस्थ आणि घाबरेलेले आहेत.
साकूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस चौकीची एकमुखी मागणी केली असून  बंद असलेली पोलीस चौकी तातडीने सुरु करून या भागात आवश्यक पोलिसांची नेमणूक करावी, त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होईल आणि  चोऱ्या, दरोडे आणि अवैध धंदे यांना आळा बसेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
Visits: 164 Today: 1 Total: 1416734

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *