भ्रष्टाचाराविरोधात पंचायत समितीवर मोर्चा ! जोर्वेचे ग्रामस्थ आक्रमक; चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
मागील तीन वर्षापासून तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीवर विखे गटाची सत्ता असून लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली गेली आहे मात्र या वस्तू गावात आलेल्या नाहीत.याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये अनागोंदी कारभार सुरू असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत, ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने जोर्वेच्या ग्रामस्थांनी आक्रमक होत पंचायत समितीवर घेराव आंदोलन करून  भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. या भ्रष्टाचाराची एक महिन्यांमध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने  ग्रामस्थांनी गुरुवारी पंचायत समितीला घेराव घातला. यावेळी उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव,सुरेश थोरात,  आण्णासाहेब थोरात, हौशीराम दिघे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड,रावसाहेब दिघे,रावसाहेब काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव,राजू बलसाने, संजय थोरात,सुखदेव चव्हाण, पुंजाहरी दिघे, हरिभाऊ इंगळे,सोपान कोल्हे, गोरख काकड, संतोष जाधव, संपत थोरात, विठ्ठल काकड,राजू शेख, राहुल बोरकर,अनिल गायकवाड, रावसाहेब यादव, सागर भवर,भाऊसाहेब दिघे, प्रमोद इंगळे,डॉ. प्रवीण काकड, अक्षय दिघे, बंटी यादव, गणेश इंगळे, योगेश जोशी, वसंत बोरकर,संदीप काकड,संदीप इंगळे, अनिल थोरात, अमोल क्षीरसागर, विद्रोही संघटनेचे अध्यक्ष भास्कर बर्डे, मीनाक्षी थोरात,मनीषा दिघे,संगीता थोरात, मंगल काकड,जयश्री दिघे,मंगल दिघे, लता बर्डे, ज्योती थोरात,अनिता काकड आदि उपस्थित होते.

जोर्वे गावांमध्ये सध्या विखे प्रणित आघाडीची सत्ता आहे.  मागील तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अनागोंदी कारभार झाला आहे. लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी झाल्या असून त्या गावांमध्ये आलेल्या नाहीत. याचबरोबर रस्त्यांची कामे दाखवली आहेत मात्र ते रस्ते झाले नाहीत. लाखो रुपयांची बाकडे खरेदी झाली असून ती दिसत नाहीत. कुंड्यांची खरेदी केलेली आहे. या सर्व भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामसभेमध्ये ही ग्रामस्थ अनेक वेळा आक्रमक झाले. याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली मात्र राजकीय दबावातून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ हतबल होऊन पंचायत समितीवर दाखल झाले.

यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत तातडीने झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची निःपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राजकीय वरददस्त लाभलेल्या या मंडळींनी गोरगरिबांचे व आदिवासींचे पैसे लाटून मोठा भ्रष्टाचार केला आहे. आपल्या बगलबच्चाना हाताशी धरून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.तीन वेळा ग्रामसभेमध्येही याबाबत नागरिकांनी आवाज उठवला मात्र सत्ताधाऱ्यांनी पळ काढला. या ग्रामसभेबाबत जिल्हाभर चर्चाही झाली आहे मात्र अद्याप कोणतीही कारवाई होत नाही.येणाऱ्या महिन्यांमध्ये जर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती समोर संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल असा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामसभेमध्ये नागरिकांनी आवाज उठवला. भ्रष्टाचाराची मोठी यादीच वाचली, यावर कोणतीही उत्तर न मिळाल्याने ग्रामसेवक व सरपंचांविरुद्ध ग्रामस्थ वेळोवेळी आक्रमक झाले मात्र सत्ताधाऱ्यांनी राजकीय वरदहस्तातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीला घेरावा घालताच सत्ताधाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Visits: 106 Today: 2 Total: 1110649

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *