वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका! आ.खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आमदार अमोल खताळ यांनी पहाणी केली.या पालखीतील वारकरी बंधू आणि भगिनींची कोणतीही अडचण होणार नाही याची सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना आ.अमोल खताळ यांनी दिल्या.

आषाढी वारीच्या निमिताने दरवर्षी संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जातांना तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामाला थांबते.गेले अनेक वर्षाची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीने या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात येत असते.मागील वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.त्यामुळे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना गांभिर्याने नियोजन करून पालखी येण्यापुर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार अमोल खताळ यांनी पारेगाव बुद्रुक येथे येवून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ, अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वाॅटरफ्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारने मंडपासाठी पाच लाख रूपये, २ लाख ग्रामपंचायती करीता अनुदान तसेच २५० शौचालय आणि स्नानगृहा करीता २०० युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून दिली असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.

आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत. पिण्याचे पाणी,तसेच वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबाबत आ.खताळ यांनी सांगितले.मंडप उभारण्यात येणाऱ्या जागांची तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाची माहीती आ.खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्या कडून जाणून घेतली.या रस्त्याच्या कामाकरीता मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचे काम होवू शकले.उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आ.खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत तहसीलदार धीरज मांजरे, अतिरीक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप,तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, ॲड. त्र्यंबक गडाख, गणेश गडाख, रावसाहेव गडाख, लक्ष्मण गडाख, सुरेश दळवी, सुखदेव गडाख, भीमराज गडाख, नवनाथ गडाख, निलेश गडाख, कैलास गोर्डे, सुनील वाकचौरे, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप युवा नेते अमोल दिघे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्षा कविता पाटील ,संपत फड, अर्जुन शिरसाट, डॉ.स्वाती डांगे, ग्रामसेवक गौरव कदम यांच्यासह पारेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यात संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी येणे हा अहील्यानगर जिल्ह्यासाठी मोठा अभिमान आहे.त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पध्दतीने व्हावे म्हणून यंदा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली असून जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी, वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन आ.अमोल खताळ यांनी केले आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1109881
