मोरवाडी धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील पठार भागातील जनतेला गेले  ४० वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी येथे धरण व्हावे अशी या साकुर पठार भागातील जनतेची अनेक वर्षाची मागणी होती, या मागणीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली असून उद्या बुधवारी मुंबईत मंत्रालयामध्ये मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोरवाडी धरणाच्या संदर्भात जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी दिली.
तालुक्यातील वरवंडी येथील दत्त मंदिरात येथील युवक कार्यकर्ते दत्तात्रेय वर्पे, राज पाटोळे आणि समस्त ग्रामस्थ वरवंडी यांच्या वतीने आमदार  खताळ यांची पेढे तुला करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.  ते पुढे म्हणाले,  तालुक्यातील साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या साठी मुळा नदीवर मोरवाडी धरण व्हावे अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. हे धरण होण्यासाठी जागाही  संपादित करण्यात आली होती. मात्र नंतर हे ठिकाण मागे पडून याच नदीवर पुढे राहुरी तालुक्यातील  मुळा धरण बांधण्यात आले.सध्या मुळा नदीवर  आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. त्यापैकी पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात साकूर पठारभागातील गावांचा समावेश नसल्याने  ही गावे  अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहिली आहेत. तसेच या धरणाच्या लाभ क्षेत्रात या पठार भागाचा समावेश व्हावा यासाठी अकोले तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. त्यामुळे पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण व्हावे अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे. त्यानुसार जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाचा सर्वे करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या  अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, त्यानुसार सर्वे  झाला आहे. बुधवारी या मोरवाडी धरणाच्या संदर्भात मुंबईला मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे,भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, खांबा गावचे सरपंच रवींद्र दातीर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, माजी सरपंच बाबाजी सागर, ॲड. अमित धुळगंड,  ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ,आरपीआय चे तालुका अध्यक्ष आशिष शेळके,ऋषीराज  परांडेकर,विद्या महाराज बानकर, पुरुषोत्तम महाराज पेटकर, गणेश डोंगरे, भागवत बस्ते,डॉ. संतोष वर्पे, बाजीराव पाटोळे,राजाबापू वर्पे, उल्हास गागरे, एकनाथ वर्पे, संपत भोसले, तुळशीराम पाटोळे, सुभाष पाटोळे यांच्यासह साकुर पठार भागातील मान्यवर व वरवंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी तुमच्यावर दहशत, दादागिरी करून तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. मात्र ते आती करत असतील तर मला सांगा, मी त्यांचा नक्कीच बंदोबस्त करेल. माजी आमदारांच्या बगलबच्चांचा आपण बंदोबस्त केला आहे.जे काही थोडे फार राहिले आहेत.त्यांचा सुद्धा  बंदोबस्त केला जाईल.  माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे असा  इशारा आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिला.
 तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथे दत्त महाराजांच्या मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही प्रस्ताव द्या, हे मंदिर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घेण्यासाठी आपण शासन पातळीवर प्रयत्न करू, तुम्ही माझ्याकडे सभा मंडपाची मागणी केली आहे.त्यामुळे  आमदार निधीतून सभा मंडपासाठी दहा लाख रुपये जाहीर करत आहे, हा सभा मंडप कुठे घ्यायचा आहे हे तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठरवावे असा सल्ला आमदार  खताळ यांनी दिला.
Visits: 210 Today: 1 Total: 1422534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *