नागरिकांनी गोदामाई कायम स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावे ः ढाकणे
नागरिकांनी गोदामाई कायम स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावे ः ढाकणे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील गोदावरी नदीपात्राची कायम स्वच्छता रहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. तर दुसरीकडे याच नदीपात्रात नागरिक मोठ्या प्रमाणात निर्माल्य, प्लास्टिक पिशव्यांसह अन्य कचरा टाकून पाणी दूषित करत आहेत. याबाबत गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांनी चिंता व्यक्त करुन नागरिकांनी गोदामाईचे पात्र कायम स्वच्छ रहावे यासाठी मनापासून प्रयत्न करावे, असे आवाहन केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदी स्वच्छ व सुंदर रहावी यासाठी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वछतादूत आदिनाथ ढाकणे हे आपल्या सहकार्यांना घेऊन दर रविवारी नदीपात्रातील केरकचरा, निर्माल्य, फाटलेले कपडे, भंग झालेल्या देवाच्या मूर्ती, फोटो, प्लास्टिक नदीपात्रातून बाहेर काढून पात्राची स्वछता करण्यासाठी अभियान राबवतात. या अभियानाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचे देखील योगदान मिळते. मात्र, नुकताच पार पडलेल्या नवरात्रौत्साव जमा झालेले हार, निर्माल्य, स्थापन केलेले घट नागरिकांनी गोदावरी नदीपात्रात विसर्जित केले. विशेष म्हणजे नदी काठाजवळ तयार करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन कुंडाचा नागरिकांना सोईस्करपणे विसर पडल्याने या कचर्यामुळे गोदामाईचे पात्र प्रदूषित झाले आहे. याबाबत चिंता व्यक्त करुन नागरिकांनी भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी निर्माल्य नदीत न टाकता त्याचे खत तयार करावे. आणि आपली गोदामाई कशी स्वच्छ राहील यासाठी मनापासून प्रयत्न करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले आहे.

