पी.आय.साहेब, किमान तेवढं वाहतुकीकडे तरी बघा! अस्ताव्यस्त वाहनांचा अडसर; पोलिसांना मात्र काहीच घेणं नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातून जाणार्या महामार्गासह सर्वच रस्त्यांवरील बकालपणात प्रचंड वाढ झाल्याने शहरातंर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र सामान्यांशी कोणतेही सोयरसुतक नसल्यागत पोलीस आणि पालिका यंत्रणा आपल्याच मस्तीत गुल असल्याचे दिसून येत आहे. मनमानी आणि बेसुमार वाढलेली अतिक्रमणं, ‘वसुली’च्या उद्दिष्टांसाठी त्याला पालिका प्रशासनाकडून मिळणारं पाठबळ आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांसह सर्वसामान्यांशी निगडीत या विषयावर पोलिसांचेही सातत्यपूर्ण दुर्लक्ष यामुळे ‘वैभवशाली’ म्हणवणार्या संगमनेरची वाहतूक व्यवस्था सामान्यांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. वारंवार आवाज उठवूनही झोपेचे सोंग घेतलेली यंत्रणा जागतच नसल्याने आता ‘पी.आय.साहेब, गुन्हेगारी जावू द्या पण किमान तेवढं वाहतुकीचं तरी बघा’ असं म्हणण्याची वेळ संगमनेरकरांवर आली आहे.

शहरातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गासह कोल्हार-घोटी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याशिवाय या महामार्गाला जोडणार्या गवंडीपूरा ते महात्मा फुले चौक, मोमीनपूरा ते तहसील कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कटारिया कॉर्नर, हॉटेल जोशी पॅलेस ते पालिका नाट्यगृह, हॉटेल काश्मिर ते बी.एड्.कॉलेज सर्कल या रस्त्यांवरही प्रचंड रहदारी असते. यातील बहुतेक रस्त्यांवर अलिकडच्या काही वर्षातच नव्याने व्यापारी इमारती, हॉटेल व अलिशान दालनंही उभी राहीली आहेत. मात्र त्यांना बांधकाम परवानगी देताना पालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित आस्थापनांमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागेची उपलब्धता आहे की नाही याचा कोणताही विचार केला नाही. त्याचा परिणाम इमारतींच्या जीवावर ‘वैभवशाली’ची माळ गळ्यात घातलेल्या संगमनेर शहरातील बहुतेक मोठ्या दालनांमध्ये येणार्या ग्राहकांना दुचाकी उभ्या करण्यासाठीही जागा नसल्याचे वास्तव आहे.

साहजिकच त्यामुळे वरील सर्व प्रमुख रस्त्यांवर विस्तारलेल्या अशा अनेक दालनांसमोर अतिशय बेशिस्त आणि मनमानी उभ्या केलेल्या वाहनांमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाढणार्या शहराची नगररचना करताना पालिका प्रशासनाने रहदारीलाच फाटा दिल्याने शहरातंर्गत वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झालेली दिसते. त्यातही फेरीविक्रेत्यांकडून दैनंदिन पावत्यांद्वारे भरमसाठ पैसा कमावून ठेकेदारीच्या माध्यमातून त्याची उधळपट्टी करण्याचे धोरण पद्धतशीरपणे शहरात रुजवले गेल्याने शहरातील गल्लीबोळाही फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि अन्य फेरीवाल्यांच्या गर्दीने अरुंद झाल्या आहेत. त्याचा फटका सामान्य पादचारी आणि दुचाकीस्वारांना बसत असून अबालवृद्धांना दररोज नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील बेकायदा रिक्षा आणि त्यांनी भररस्त्यातच परस्पर निर्माण केलेले थांबेही शहरातील बकालपणाचे मोठे सहकारी ठरले आहेत. नवीन नगर रोड कॉर्नर, राजपाल क्लॉथचा कॉर्नर, हॉटेल काश्मिरसमोरील ‘राजाश्रय’ असलेला आणि त्यामुळे अतिशय मुजोर बनलेला रिक्षाथांबा, अशोक चौक आणि चावडीजवळ भर रस्त्यात उभ्या राहणार्या बहुतेक अनधिकृत आणि प्रवाशी वाहतुकीसाठी रद्द ठरवलेल्या रिक्षा घेवून अनेकजण ‘पोटा’च्या नावावर सामान्यांचा छळ करीत आहेत. मात्र पोलिसांना कर्तव्याचाच विसर पडल्याने आणि पालिका केवळ ‘लाटण्यात’च धन्य असल्याने सामान्य पादचारी, दुचाकीस्वार, वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना कोणीच वाली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संगमनेर उपविभागातील वाहतुक शाखेला पुनर्जिवन प्राप्त करुन देत त्यासाठी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस कर्मचार्यांची नियुक्ति केली होती. त्यामुळे शहरातंर्गत वाहतुकीला काही प्रमाणात शिस्तही लागली होती. पप्पू कादरी, गोपाळ उंबरकर यासारख्या अधिकार्यांनी आपल्या कार्यकाळात शहरातील अंतर्गत रस्ते मोकळे राहतील यासाठी पथदर्शी काम केल्याचेही दाखले आहेत. मात्र त्यांनतरच्या पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्थेला दुय्यम ठरवताना संगमनेरची वाहतूक शाखाच बरखास्त केल्याने वाहतुकीतील बकालपणा वाढून शहराची अक्षरशः रया गेली आहे. आजच्या स्थितीत पूर्वापारपासून वाहतूक पोलीस थांबत असलेल्या बसस्थानक, हॉटेल काश्मिर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या प्रचंड गर्दीच्या ठिकाणीही वाहतूक पोलीस आढळत नसल्याने शहर पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

वर्दळीच्या रस्त्यांवर बिनधास्त चारचाकी वाहने उभी करुन आसपासच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणार्यांसह भररस्त्यात भंगारातल्या रिक्षा घेवून मुजोरी करणार्या रिक्षाचालकांमुळे गेल्याकाही वर्षात संगमनेरची वाहतूक समस्या जटील बनली आहे. मध्यंतरी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वापरातून बाद झालेल्या अशा रिक्षांविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर शहरातील वाहतुकही सुरळीत झाली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर पोलिसांना जणू आपल्या कर्तव्याचाच विसर पडल्याने आजच्या स्थितीत पुन्हा एकदा बेशिस्तीने कळस गाठला आहे. त्याचा परिणाम जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होवून सामान्य संगमनेरकराला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पोलिसांनाच त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

असं म्हणतात की प्रशासनाची काम करण्याची इच्छा असते मात्र त्यांना राजकीय दबावात वावरावे लागते. संगमनेरात मात्र याउलट स्थिती आहे. गेल्या चार वर्षांपासून संगमनेर नगरपरिषदेवर प्रशासकांचे राज्य आहे. या कालावधीत त्यांच्याकडून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून बेकायदा अतिक्रमणं, रिक्षाथांबे, फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन दिलासा देण्याची गरज असताना उलट त्यांनी आपला ‘अधिकार’ वापरुन अशी कोणतीही ‘धडक’ कारवाई केल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकांनाही राजकीय कीडा चावला की काय? अशीही शंका निर्माण झाली आहे.

