‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या सूत्रधाराचे ‘राजकीय कनेक्शन’! शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चा पदाधिकारी; खासदाराकडून दबावाचीही चर्चा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ चौगुलेच्या बेकायदा उद्योगांसह त्याचे राजकीय कनेक्शनही आता उघड झाले आहे. गुटखा, गांजा यासह अंमलीपदार्थांच्या तस्करीत अखंड नाव येत असलेला हा कुख्यात गुन्हेगार शरद पवार गटाचा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालयप्रमुख असून ज्येष्ठनेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतची त्याची छायाचित्रेही सध्या सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. याप्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर शरद पवार गटाच्या एका खासदाराने त्याच्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा सध्या सुरु असून त्याला मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या तो बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत असून उर्वरीत आरोपींपर्यंत घारगाव पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत.
गेल्या 7 जुलैरोजी पठारभागात राहणार्या व सध्या पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका 19 वर्षीय तरुणीला मंचर येथे बोलावून युसुफ चौगुले याने स्वतःच्याच वाहनातून शादाब तांबोळी याच्या मदतीने तिचे अपहरण केले होते. तत्पूर्वी सदरील पीडित मुलगी इयत्ता नववीत असताना याच चौगुलेने वेगवेगळ्या माध्यमातून तिच्यावर दबाव निर्माण करुन तिला आरोपी शादाब तांबोळी याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. सदरचा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी आरोपी शादाबची कानउघडणी केली, त्यामुळे त्यांच्यातील संबंध काहीकाळ स्थगित झाले. मात्र पीडित मुलगी महाविद्यालयीन शिक्षणासाठी संगमनेरला येताच आरोपी शादाबने युसुफ चौगुलेच्या इशार्यावरुन पुन्हा तिचा पाठलाग करीत यावेळी कुणाल शिरोळे या आरोपीच्या मदतीने तिला भुलथापा मारीत पुन्हा प्रेमसंबंध कायम केले आणि नंतर तिला एका कॅफे हाऊसमध्ये नेवून तिच्याशी लगट करीत त्याची छायाचित्रे काढली व नंतर त्यांचाच आधार घेवून त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
संगमनेरात दोन वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर पीडिता पुणे जिल्ह्यातील एका व्यावसायिक शिक्षण देणार्या महाविद्यालयात दाखल झाली. मात्र मनात सुरुवातीपासूनच ‘लव्ह जिहाद’ घडवण्याचा चंग बांधलेल्या युसुफ चौगुलेने तिचा पीच्छा सोडला नाही. त्याने ‘त्या’ महाविद्यालयात शादाब तांबोळीसह जावून वारंवार त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली. त्या दोघांच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या करण्याची धमकीही भरली. त्यावेळी दोघांनी काडीमोड करुन एकमेकांकडून घेतलेल्या सगळ्या भेटवस्तू परत करण्याचा आणि कायमचे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र मनात स्पष्ट हेतू असलेल्या चौगुलेला हा प्रकार मान्य नव्हता. त्यामुळे त्याने दुसरे षडयंत्र उभे करीत थेट पीडितेचे अपहरण करुन तिला बळजबरीने पळवून नेण्याची आणि धर्मांतरण करुन शादाब तांबोळीसोबत तिचा ‘निकाह’ लावून देण्याची दुसरी योजना आखली. त्यानुसार त्याने रविवारी (7 जुलै) पीडितेला प्रकरण मिटवण्याचे खोटे कारण सांगून पुणे जिल्ह्यातील तिच्या वसतीगृहातून मंचर येथे येण्यास सांगितले. तेथे जाताच शादाब तांबोळी याने युसुफ चौगुलेच्या वाहनात बसवून तिचे अपहरण केले. पीडितेने तसे करण्यास विरोध केला असता तिला पाण्यातून गुंगीचे औषध देवून एका महिलेसह अन्य एकाच्या मदतीने थेट मुंबईत नेले.
मुंबईतील आदिल आणि आयाज पठाण यांच्या मदतीने त्या दोघांनाही तीन दिवस सानपाडा येथील एका लॉजवर थांबवून आरोपी शादाब तांबोळी याला पीडितेवर अत्याचार करण्यास प्रोत्साहन दिले. या कालावधीत मुंबईतील ‘त्या’ दोघांनी अन्य दोघांच्या मदतीने पीडितेला बांद्रा येथे नेवून बळजबरीने, फसवून तिचे धर्मांतरण घडवून आणले. या कालावधीत सलग तीन दिवस आरोपी शादाब तांबोळी याने तिच्यावर शारीरिक अत्याचारही केले. या प्रकरणाने संगमनेर तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले याला ताब्यात घेत त्याला पीडित मुलीसह तिला फसवून पळवून नेणार्या शादाब तांबोळी याला घारगाव पोलिसांसमोर हजर होण्यास भाग पाडले.
मात्र चार दिवसांत घडलेल्या वेगवेगळ्या घटना, बळजबरीने अपहरण, त्यासाठी गुंगीच्या औषधांचा वापर, मुंबईत नेवून दिलेल्या धमक्या, शादाबकडून सलग तीन दिवस झालेला शारीरिक व मानसिक छळ आणि प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच दिलेल्या वेगवेगळ्या धमक्या अशा कारणांनी पीडितेची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचारांसाठी तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिल्यानंतर गेल्या शुक्रवारी (ता.26) तिने घारगाव पोलीस ठाण्यात युसुफ चौगुले, शादाब तांबोळी, कुणाल शिरोळे व आयाज पठाण यांच्यावर अपहरण, फसवणूक व अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने त्याच दिवशी रात्री युसुफ चौगुले याच्या श्रीरामपूरात जावून मुसक्या आवळल्या.
सुरुवातीला या प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ चौगुले हा पठारभागातील गुटखा तस्कर असल्याची चर्चा होती. मात्र त्याची व्याप्ती केवळ पठारभागच नसून उत्तर नगरजिल्हाभर असल्याचे समोर येण्यासह तो अंमलीपदार्थांचाही तस्कर असल्याचे समोर येवू लागले. धक्कादायक म्हणजे त्याने आपल्या बेकायदा उद्योगासाठी पठारभागातील आदिवासी, ठाकर समाजातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे आणि आजही अनेक तरुण परराज्यातील कारागृहांमध्ये खितपत पडल्याचीही चर्चा कानावर आली असून आततर तो शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राचा ग्रंथालय विभागप्रमुख असल्याचे व ज्येष्ठनेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतची त्याची छायाचित्रेही सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या प्रकरणात त्याचे थेट राजकीय कनेक्शन समोर आले असतानाच आता शरद पवार यांच्या गटाकडून निवडून आलेल्या एका खासदाराने त्याच्यावरील कारवाई सौम्य करण्यासाठी पोलिसांवरच ‘दबाव’ आणल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याबाबत दैनिक नायकने दुजोरा मिळवण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. इतक्या गंभीर प्रकरणातही कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो नालायकपणाच म्हणावा लागेल अशा प्रतिक्रियांचा महापूर मात्र सोशल माध्यमातून वाहत आहे. याबाबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत खुलासा होण्याची नितांत गरज आहे.
‘निष्क्रियते’चा अखंड ठपका असलेल्या घारगाव पोलिसांकडून संपूर्ण तालुक्याचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणार्या या प्रकरणाचा किती गांभीर्याने तपास होतो याबाबत सुरुवातीपासूनच साशंकता आहे. ताब्यात असलेला गुटखा तस्कर आणि घारगाव पोलिसांचा अर्थपूर्ण ‘स्नेह’ लपून राहिलेला नाही. अशास्थितीत दाखल झालेल्या या गुन्ह्याचा घारगाव पोलीस खरोखरी प्रामाणिकपणे तपास करतील का अशी शंका निर्माण झालेली असतानाच गुन्हा दाखल होवून चार दिवस उलटूनही पोलिसांकडून अन्य आरोपींच्या अटकेबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने स्वतःला हिंदुत्त्ववाद्यांचे सरकार म्हणवणार्या ‘महायुती’ सरकारबाबतही संशय निर्माण झाला आहे.