मध्यमवर्गीयांना ‘पैसे कमावण्या’च्या प्रशिक्षणाची गरज! आमदार सत्यजित तांबे; ‘पत्रकार कट्टा’ कार्यक्रमात रोखठोक मतं..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण किती पैसे कमावतो याचा विचार करुन आपला खर्च किती असावा याचे आपल्याला प्रशिक्षणच दिले गेलेले नाही. अनंत अंबानींच्या लग्नात आठ ते नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे बोलले जाते. यावरुन अतिश्रीमंतांनाही आर्थिक खर्चाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. खरेतरं मोठ्या माणसांनी खूप जबाबदारीने वागण्याची गरज असते. अंबानींनी किती खर्च करावा हा त्यांचा प्रश्न असला तरी ज्यांच्याकडे बघून समाज वावरत असतो, त्या माणसांनी अधिक जबाबदारीनेच वागले पाहिजे हे देखील महत्त्वाचे आहे. माणूस जितका मोठा असतो, तितका साधेपणा त्याच्या अंगी असला पाहिजे. तेव्हाच समाजातील माणसं त्यांच्याकडे पाहुन व्यवस्थित राहु शकतात असे रोखठोक मत पदवीधर मतदार संघाचे सदस्य, आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘पत्रकार कट्टा’ या अभिनव कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरीप्रमाणे मत व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश सालपे, उपाध्यक्ष अमोल मतकर, खजिनदार संजय आहिरे व सचिव शेखर पानसरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी, नितीन ओझा, गोरक्षनाथ मदने, सुनील महाले, गोरक्ष नेहे, नीलिमा घाडगे, सोमनाथ काळे, सचिन जंत्रे, सुशांत पावसे, संदीप वाकचौरे, बाबासाहेब कडू, अंकुश बुब, सुभाष भालेराव, भारत रेघाटे, बाळासाहेब गडाख, सुखदेव गाडेकर व काशिनाथ गोसावी आदी उपस्थित होते.
आर्थिक शिस्त या विषयावर अधिक बोलतांना आमदार तांबे पुढे म्हणाले की, एकीकडे अतिश्रीमंतांना आर्थिक खर्चाचे प्रशिक्षण देण्याची तर दुसरीकडे मध्यमवर्गीय घटकाला ‘पैसे कसे कमवायचे’ इथून प्रशिक्षणाची सुरुवात करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे पैसा कमावण्याचे शास्त्र कोणत्याही शिक्षण व्यवस्थेत शिकवले जात नाही. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या पैशांचा कसा विनियोग करायचा याची माहितीही आपल्याला नसते. ज्याचे उत्पन्न 50 हजार रुपये आहे तो लगेच स्वतःचे घरं बांधण्याचे प्रयत्न सुरु करतो. आजच्या युगात दोन शयनकक्षाची सदनिका घ्यायची म्हटलं तरीही त्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांची गरज असते. कर्जापोटी उभारलेल्या या खर्चाची परतफेड करतानाही त्यासाठी जवळपास 20 वर्ष परताव्याच्या बोलीवर 25 ते 30 हजार मासिक हप्ता भरावा लागतो.
म्हणजे वयाच्या 35 ते 40 या वयाच्या दरम्यान घर घ्यायचे आणि राहिलेले संपूर्ण आयुष्य त्यापोटी घेतलेले कर्ज फेडण्यात घालवायचे असे चित्र सगळीकडेच दिसत असल्याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. एखाद्याच्या 50 हजारांच्या उत्पन्नातील निम्म्याहून अधिक रक्कम कर्जाच्या हप्त्यांसाठी गेली तर अशा कुटुंबाचे आर्थिक गणितं बिघडल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या आर्थिक नियमानुसार आपल्या एकूण उत्पन्नातील केवळ 15 ते 20 टक्के इतकाच खर्च घरासाठी झाला पाहिजे, मग ते विकत घ्या किंवा भाड्याने, मात्र यापेक्षा अधिक खर्च केला तर त्या कुटुुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अति घराच्या मागे लागणं हा आर्थिक नियोजनाचा चुकीचा पायंडा गेल्याकाही वर्षात आपल्या देशात खोलवर रुजल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अंबानींच्या लग्नांवरील खर्चाचे उदाहरण सांगताना त्यांनी मोठ्या माणसांनी आपल्या संपत्तीचे अशाप्रकारे प्रदर्शन घडवणं अयोग्य असल्याचे मत नोंदवले. कोणी किती खर्च करावा हा प्रत्येकाचा अधिकार असला तरीही मोठ्या माणसांकडे पाहुणच छोटी माणसं त्याचे अनुकरण करीत असतात याचा प्रकर्षाने विचार करण्याची गरज व्यक्त केली. या लग्न सोहळ्यानंतर देशातील अनेक मुलींना आपलंही लग्न राधिका मर्चंटप्रमाणेच व्हायला पाहिजे असे वाटतं असेल. पण त्याचवेळी अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे पैसा आहे का याचा कोणीही विचार करीत नाही. आज आर्थिक स्थिती नसतानाही केवळ आपल्या मुलांच्या हट्टापायी ‘प्री-वेडींग’च्या फोटोशूटसाठी लाखों रुपयांचा खर्च करणारे पालक आपण बघतो. या सगळ्या चुकीच्या प्रथा मोडायची जबाबदारी मोठ्या माणसांचीच असते समाजात वावरताना आपला आदर्श निर्माण व्हायला हवा असे मतंही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
आरक्षणावरुन देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाबाबतच्या प्रश्नावरही आमदार सत्यजित तांबे यांनी रोखठोक भाष्य केले. आरक्षण देताना समाजातल्या ज्या घटकांना संधी मिळालेली नाही, अशांना आरक्षण मिळण्याची नितांत गरज असते. मग ते जातीय आधारावर असेा, अथवा आर्थिक निकषांवर. अशांना संधी देणं हेच आरक्षणाचं काम असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वंचित घटकांना संधी मिळण्यासाठी त्यांना आरक्षण देवून एका उंचीपर्यंत नेण्याचे स्वप्नं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बघितले होते. अशा वंचित घटकांच्या किमान तीन पिढ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणं आवश्यक असल्याची गरजही आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
आजही देशातील मागासवर्गीय समाजात असे घटक आहेत की ज्यांच्या पहिल्या पिढीलाही अद्याप आरक्षणातून संधी मिळाली नसल्यावर झोत टाकताना देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांनंतरही समोर येणार्या या घटना आरक्षणाचा मूळ हेतु अद्यापही साध्य झाला नसल्याचे दर्शवितात असेही आमदार तांबे म्हणाले. यासर्व गोष्टींचा विचार करता यापुढेही देशातील अशा घटकांना आरक्षण द्यावेच लागेल, मात्र त्याचवेळी ते देताना एखाद्याला वारंवार त्याचा फायदा होतोय का? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त करतांना जातीय आरक्षण एकदम काढणं शक्य होणार नाही, त्यासाठी सर्व्हेक्षण करणं, त्यावर सखोल अभ्यास होणं आवश्यक असून जातीनिहाय जनगणना हा त्यावरील प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट मतंही आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
(क्रमशः)
एका प्रश्नाचे उत्तर देताना आमदार सत्यजित तांबे यांनी 1999 साली झालेल्या आपल्या राजकीय पदार्पणापासून आजवरच्या राजकीय प्रवासाचा धावता आलेख मांडला. या दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष निवडणूक लढवण्यापर्यंतच्या विषयांनाही स्पर्श केला. त्यासोबतच संगमनेरच्या पत्रकारितेला मोठा वारसा असल्याचे सांगत ‘अपवाद’ वगळता शहरातील बहुतेक पत्रकार सकारात्मक, विकासाच्या मुद्द्यावर आणि संगमनेरच्या हितासाठी काम करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी बोलताना केला.