मुळानदीच्या पात्रात वाळू तस्करांचा धुडगूस कायम! दोन चोरटे पकडले; पर्यावरण कायद्यान्वये कारवाई होणार का?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील नद्यांच्या पात्रात वाळू तस्करांचा धुडगूस कायम असून सोमवारी घारगावनजीकच्या मुळापात्रात दोघा वाळू चोरांचे ट्रॅक्टर पकडण्यात ‘अखेर’ तलाठ्यांना यश आले. आंबी खालसा शिवारातील पात्रातून पहाटेच्या अंधारात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती तलाठी दादा शेख यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून सराटीजवळ दोघा तस्करांना रंगेहाथ पकडले. यावेळी एकाने ट्रॅक्टरसह तेथून पळ काढला तर, दुसर्याने तलाठ्याला दमबाजी करीत ट्रॅक्टर सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी घारगाव पोलीस पोहोचल्याने ‘अखेर’ दोन्हीही ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी वाळू तस्करी करताना आढळून आल्यास संबंधितावर प्रचलित कायद्यांसह पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या प्रकरणात त्याचे पालन होते का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.24) पहाटे तीनच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित बोरबनवाडी शिवारात घडली. तलाठी दादा शेख यांना बोरबनमधून दोन ट्रॅक्टरद्वारा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा केल्यानंतर तलाठी शेख यांनी कोतवाल शशीकांत खोंड यांना सोबत घेत तस्करी सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. हे दोघेही सराटीजवळील मंदिरासमोर पोहोचले असता नदीपात्रातून घारगाव-खोबरेवाडीच्या दिशेने एकामागोमाग दोन ट्रॅक्टर येत असल्याचे पाहताच त्यांनी दोघांनाही आपली दुचाकी आडवी घालून थांबण्यास भाग पाडले.
यावेळी त्यांच्याकडे परवाना मागितला असता ते उडवाउडवी करु लागले. त्यामुळे तलाठ्यांनी त्या दोघांनाही ट्रॅक्टर घारगाव पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत स्वप्नील तानाजी गाडेकर (रा.बोरबन) या तस्कराने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर घेवून तेथून पळ काढला. तर, दुसरा तस्कर दत्तात्रय गंगाधर गाडेकर हा तलाठी शेख आणि कोतवाल खोंड यांच्याशी हुज्जत घालून त्यांना दमबाजी करु लागला. प्रसंगावधान राखून तलाठ्यांनी तत्काळ घारगाव पोलिसांना माहिती दिली. या दरम्यान त्या वाळू तस्कराने आपलाही ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश तळपाडे व नामदेव बिरे तेथे पोहोचल्याने त्याची ‘भंबेरी’ उडाली.
फुकटाचा माल ओरबाडताना चोरटे जीवावर उदार झालेले असतात, त्यामुळे तलाठी शेख यांनी वाळू तस्कराशी हुज्जत सुरु असताना आपले सहकारी तलाठी युवराजसिंग जारवाल व सोमनाथ शेरमाळे यांनाही पाचारण केले होते. अखेर महसूल आणि पोलिसांच्या पथकासमोर वाळूचोर दत्तात्रय गाडेकर याला गुडघे टेकावे लागले. या कारवाईत संयुक्त पथकाने त्याच्यासह पळवून नेलेला ट्रॅक्टरही ताब्यात घेतला. मात्र या गदारोळात संबंधित तस्कराने नवाकोरा ट्रॅक्टर गायब करुन त्या बदल्यात भंगार झालेला ट्रॅक्टर आणून पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी दोघाही ट्रॅक्टर मालकांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
गेल्या पंधरवड्यात संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी तालुक्यातील वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी कारवाईत वाळूचोरी पकडली गेल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार यापूर्वी शहरातील एका रिक्षाचालकावर याप्रमाणे पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आता वाळू तस्करांसाठी नंदनवन मानल्या जाणार्या मुळा नदीच्या पात्रातही दोघांना रंगेहाथ धरल्याने त्यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणण्यासह पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाच नद्यांचे सान्निध्य लाभलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या दशकभरात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली असून त्यात आता गुन्हेगारी वृत्तींचाही प्रवेश झाला आहे. संगमनेर तालुक्यातील प्रवरा. म्हाळुंगी व आढळा या नद्यांच्या पात्रातून ट्रॅक्टर, पिकअप जीप, रिक्षा बैलगाड्या व गाढवांचा वापर करुन तर, पठार भागातील मुळा नदीपात्रातून चक्क डंपर व ट्रॅक्टरद्वारे बेकायदा वाळू वाहतूक केली जाते. बिनभांडवली असलेल्या या व्यवसायातून चिक्कार पैसा मिळत असल्याने तालुक्यातील नद्यांच्या पात्रात अक्षरशः ‘टोळ्या’ निर्माण झाल्या असून पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. या बेकायदा उद्योगाला उध्वस्त करण्यासाठी तस्करांवर कठोर कारवाईची गरज असून पकडलेल्या प्रत्येक वाळू चोरावर ‘पर्यावरण संरक्षण कायद्यातील’ कठोर तरतुदींचा अवलंब होण्याची आवश्यकता आहे. संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनीही अशाच कारवाईचे समर्थन केले असल्याने या प्रकरणात त्यानुसार कारवाई होते का हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
तलाठी दादा शेख यांनी पकडलेल्या दोनमधील एक ट्रॅक्टर अलिकडेच खरेदी केलेला होता. त्यामुळे दोघा तस्करांनी त्यांना दमदाटी करीत त्यातील नवा ट्रॅक्टर पळवून नेला. मात्र त्यानंतर आलेल्या अन्य दोन तलाठी व घारगाव पोलिसांच्या रेट्यामुळे ‘त्या’ तस्कराला पळवून नेलेला ट्रॅक्टर पुन्हा आणून पोलिसांच्या स्वाधीन करणं भाग पडलं. मात्र त्यातही त्याने आपला ‘डाव’ साधीत प्रत्यक्षात पळवून नेलेल्या नव्याकोर्या ट्रॅक्टरच्या जागी भंगार झालेला दुसराच ट्रॅक्टर आणून जमा केला. या प्रकरणाचीही गांभीर्याने दखल घेवून सरकारी कर्मचार्याला कर्तव्यापासून रोखणे, दमबाजी करणे व कब्जात घेतलेला मुद्देमाल पळवण्याचा गुन्हा दाखल करुन पळवून नेलेला ‘तो’ ट्रॅक्टरही जप्त करण्याची गरज आहे. त्याशिवाय घारगावमध्ये फोफावलेल्या वाळू तस्करीला लगाम लागण्याची शक्यता धुसरच आहे.