तिगाव, आंबीखालसा ग्रामपंचायती जिल्ह्यात अव्वल स्वच्छता अभियानामध्ये केली उल्लेखनीय कामगिरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२०२३ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तिगाव आणि आंबीखालसा ग्रामपंचायतींनी अव्वलस्थान प्राप्त केले.

महाराष्ट्र शासनाकडून सन २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावणे. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, नागरिकांचे स्वच्छतेबाबत होणारे मतपरिवर्तन व गावागावांमधून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग घेवून ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन, या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरीता हे अभियान राबवण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. जिल्हा परिषद गटस्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता. गटस्तरीय स्पर्धेत सर्वात जास्त गुण प्राप्त करणार्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समितीने केली. त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची निवड केली. या अभियानामध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तिगाव व आंबीखालसा या ग्रामपंचायतींना या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा स्तरावर अव्वल क्रमांक मिळाला आहे.

तिगाव ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अभियानात जिल्हास्तरीय सहा लक्ष रकमेचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. याबाबत सरपंच ज्ञानेश्वर सानप व ग्रामविकास अधिकारी सतीश गाडेकर यांनी सांगितले, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेवून मग्रारोहयो योजनेतून अठरा हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली. स्वच्छ भारत अभियानातून दोन सार्वजनिक शौचालये बांधले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम उत्तमप्रकारे केले. शाळांमध्ये बोलक्या भिंती रंगवल्या अशा विविध कामांच्या माध्यमातून गावचा कायापालट केला.

आंबीखालसा ग्रामपंचायतीने घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन या प्रकारात स्व. वसंतराव नाईक जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. सरपंच बाळासाहेब ढोले व ग्रामविकास अधिकारी विजय आहेर यांनी सांगितले, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन गावामध्ये विपुल प्रमाणात वृक्ष लागवड केली, गावामधील सांडपाणी व्यवस्थापन उत्तमरित्या केले व त्याचे शुध्दीकरण नैसर्गिक पध्दतीने होईल अशी व्यवस्था निर्माण केली. शाळा, अंगणवाड्यांच्या ठिकाणी शोषखड्डे खोदून सांडपाणी त्यामध्ये जिरवण्याची व्यवस्था केली. महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याची व्यवस्था केली. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा बसविली. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती झाली. गाव स्वच्छ राखण्यात फार मदत झाली त्यामुळेच हा विशेष पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले. या प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची तपासणी विभागस्तरीय तपासणी समितीकडून करण्यात येणार आहे. याकामी विस्तार अधिकारी राजेंद्र ठाकूर, राजेंद्र कासार, सदानंद डोके यांनी विशेष प्रयत्न केले.

नागरिकांच्या सहकार्याने अभियान यशस्वी ः नागणे
संगमनेर तालुक्यातील तिगाव व आंबीखालसा ग्रामपंचायतींनी मिळवलेले यश हे नागरिक व प्रशासन यांच्या सहकार्याने मिळाले आहे. स्वच्छतेबाबत अधिक चांगला दृष्टीकोन ठेवून काम केल्यामुळे लोकांची मानसिकता बदलत आहे. पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम राबवण्यात अधिक चांगले प्रयत्न झाले आहे. व्यापक पातळीवर बदलाच्या दिशेने चांगले काम झाले आहे. त्यामुळे यश मिळाले आहे.
– अनिल नागणे (गटविकास अधिकारी-पंचायत समिती)
