आमदार थोरातांच्या पाठपुराव्यातून रस्त्यांसाठी ३२ कोटी ः राऊत विरोधकांनी केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमावर जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी ते निमगाव भोजापूर, मालदाड ते चिंचोली गुरव, दरेवाडी ते कौठे मलकापूर आणि तिरंगा चौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळाला आहे. हा निधी मिळून काही ठिकाणी कामे सुरूही झाली आहे. मात्र फक्त प्रसिद्धीकरीता सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन म्हणजे वरातीमागून घोडे असून आमदार थोरात यांच्याच प्रयत्नांतून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत व माजी सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विकासकामांकरिता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यामधून आशापीर बाबा-चिंचोली गुरव-नान्नज दुमाला-सोनोशी-मालदाड या १९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी, तर संगमनेर नगरपालिका हद्द तिरंगा चौक-घुलेवाडी ते मालदाड या ६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ६० ते गुंजाळवाडी राजापूर-निमगाव भोजापूर या ११ किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. रणखांबवाडी दरेवाडी-कौठे मलकापूर या ६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या कामांचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवातही झाली आहे. चिंचोली गुरव ते नान्नज दुमाला या रस्त्याची प्राथमिक स्थितीतील साफसफाई पूर्ण झाली असून खडीकरण करण्याचे काम सुरू आहे. आणि इतर ठिकाणीही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांकडून कोणताही पाठपुरावा न करता होणारे भूमिपूजन म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका सीताराम राऊत यांनी केली आहे. खासदार महोदयांनी मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये लक्ष दिले नाही किंवा कोणत्याही निधीसाठी पाठपुरावा केला नाही. सदर रस्त्यांच्या कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच निधी मिळाला आहे. याबाबतचा पत्र व्यवहाराही उपलब्ध आहे, असा कोणताही पत्रव्यवहार खासदार महोदयांकडे नाही. फक्त तालुक्यातील काही बगलबच्चांच्या आग्रह असतो म्हणून येऊन त्यांनी हा भूमिपूजनाचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याची टीका करुन न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
