वाकचौरेंना प्रवेश, पण बबनरावांचा पावलोपावली अपमान! कोपरगावच्या भरत मोरेंचे स्व. बाळासाहेब ठाकरेंना लिहिलेले पत्र व्हायरल


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर नाराज ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून घोलप समर्थक नाराज असल्याचे दिसून येत आहे. २०१४ ला वाकचौरे यांनी लोकसभेला शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून पुन्हा वाकचौरेंना लोकसभेसाठी तिकीट मिळणार असल्याची चर्चा असल्याने घोलप समर्थक नाराज आहे. त्यामुळे कोपरगाव येथील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी थेट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावे लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय, ज्याची चर्चा होत आहे.

पत्रास कारण की, आपल्या आदेशानुसार आम्ही शिवसैनिक आजपर्यंत उद्धवसाहेबांच्या आणि आदित्यसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे निष्ठेने उभे होतो आणि राहणार आहे. साहेब,अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, उपनेते, जेष्ठ कार्यकर्ते निघून गेले नाही तर त्यांनी शिवसेनेशी गद्दारीच केली… पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांची मानसिकता खिळखिळी होवू दिली नाही ती निष्ठावंत शिवसैनिकांनी… मोठ्या गद्दारीनंतर आता शिवसेना संपली असं बोलणार्‍यांचे दात घश्यात घातले ते निष्ठावंत शिवसैनिकांनी… काही न मिळवता, न पदरात पाडता नशिबी फक्त पोलिसांच्या लाठ्याकाठ्या.. विरोधकांच्या षडयंत्रात संसाराची राखरांगोळी करुन घेतली… तडीपार्‍या भोगल्या.. काहींनी तर आपले प्राणही गमावले.. काही निष्ठावंत शिवसैनिक आजही स्वखर्चाने गर्दी करून शिवसेनेची इज्जत वाचवत उपाशी पोटी जय भवानीच्या घोषणा देवून घरच्या भाकरी सोबत शिव्या खायला घरी पोहचतात…

स्थानिक राजकारणापाई कैक निष्ठावंत शिवसैनिक देशोधडीला लागले. कुटुंब उध्वस्त झाले तरीही निष्ठावंत शिवसैनिक आजही दुर्लक्षितच का केला जातो आहे साहेब..? याचे उत्तर आम्हाला आपल्याकडून पाहिजे आहे. निष्ठावंत शिवसैनिकांची आर्त हाक आणि होत असलेल्या उद्धवसाहेबांच्या आजूबाजूच्या बडव्यांकडून अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी निष्ठावंताची सामुदायिक किंचाळी उद्धवसाहेबांच्या कानावर कधी पडेल साहेब? साहेब आमचं निष्ठावंताचं मनोगत वाचून आपण नक्की पक्ष हिताचा आदेश द्याल अशी अपेक्षा आहे. शिवरायांना आई भवानी मातेने साक्षात्कार देवून भवानी तलवार दिली. दृष्टांच्या तावडीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी.. तसाच साक्षात्कार आपण स्वत: उद्धवसाहेबांना देऊन भवानी तलवारीच्या जागी शिवसैनिकांना समजून घेण्याची इच्छा आणि ताकद द्यावी तरच आणि तरच आपले भगवा फडकवण्याचे स्वप्न सत्यात साकारता येतील तशी आज परिस्थिती आहे साहेब…

आजचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ज्वलंत उदाहरण बघा साहेब… गद्दारी करून आलेल्या वाकचौरेंना पुन्हा पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी प्रवेश दिला. प्रवेशावेळी सगळ्या भामट्यांनी पैशावर खोट्या शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीवर नेली. लबाडी खोटारडेपणा करणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक माजी पदाधिकारी, साखरसम्राटांची बक्कळ नोटांची सुपारी घेऊन निष्ठावंत शिवसैनिकांना डिवचण्याचे कटकारस्थान केले. बबन घोलपांसारख्या निष्ठावंत नेतृत्वाचा पावलोपावली नियोजित तटबंदी करून अपमान करत घोलपांना बिथरलेल्या साखरसम्राटांच्या पैशावर बडव्यांना खूश केले. पुन्हा भोळ्या पक्षप्रमुखांचा घात केला. साहेब आता सोशल मीडियावर कुठल्याही गोष्टी गुपित न राहता काही सेकंदात सार्वजनिक गोष्टी होतात. त्यामुळे किती करोड आले आणि कोणाकोणाच्या वाट्याला कोणी स्वत:ला ठेवून किती दुसर्‍याला दिले, हे लगोलग कळतं.

बडव्यांच्या शिर्डी आणि अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माजी पदाधिकारी दलालांच्या नावावर कुठे कुठे जमिनी आहेत हेही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुराव्यानिशी मिळते साहेब. मग साहेब एकनाथ शिंदे यांनी जे केले ते योग्य होते? असे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांची मानसिकता होवू लागली आहे. साहेब उद्धवसाहेबांची लाट जरूर होती पण आता बडव्यांच्या लाचखोरीत मातोश्री पुन्हा बदनाम होत आहे. नवीन प्रवेश केलेल्या गब्बर नेत्यांना, त्यांच्या मुलाला, पुतण्याला सरळ उपनेतेपद दिले जाते आणि मसनात जाईपर्यंत निष्ठावंताला साधं शाखाप्रमुख पदही दिलं जात नाही. शेवटी अंतर्गत संघर्षात निष्ठावंताचा बळी दिला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *