फायनान्स कंपनीलाच सव्वासहा लाखांचा चुना! बडतर्फ कर्मचार्याचा कारनामा; फसवणुकीचा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांमध्ये बनावट सोनेतारण ठेवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या एकामागून एक घटना समोर येत असतांना आता संगमनेरातील एकाने चक्क काम करीत असलेल्या फायनान्स कंपनीलाच चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या वर्षातील अवघ्या दीड महिन्यात त्याने एल अॅण्ड टी या वित्त पुरवठा करणार्या संस्थेत परस्पर अफरातफर करुन 6 लाख 24 हजार 523 रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरुन हल्ली घुलेवाडीत राहणार्या सचिन विजय आढाव याच्याविरोधात घारगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार खासगी पातळीवर वित्त पुरवठा करणार्या नामांकित ‘एल अॅण्ड टी’ या कंपनीच्या घारगाव शाखेत घडला आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक मुकेश गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. या कंपनीत पूर्वी कर्जवसुलीसाठी सेवेत असलेल्या आरोपी सचिन आढाव याने गेल्यावर्षी 5 जून ते 24 ऑगस्ट, 2022 या कालावधीत संगमनेरसह कोपरगाव, राहाता, राहुरी व पारनेर तालुक्यातील कर्जदारांना केलेल्या वित्त पुरवठ्याच्या बदल्यात त्यांच्याकडून मासिक हप्त्याची रक्कम जमा केली, मात्र सदरील रक्कम नियमानुसार संस्थेत भरलीच नाही.

त्याच्या कामकाजातील अफरातफर समोर आल्यानंतर संस्थेने संबंधित कर्मचार्याला बडतर्फ केले व त्याच्या विरोधात अंतर्गत चौकशी केली असता त्याने वरील पाच तालुक्यातील कर्जदारांकडून दीड महिन्याच्या कालावधीत जमा केलेली रक्कम भरलीच नसल्याचे सिद्ध झाले. सदरील रकमेचा भरणा करण्यासाठी संस्थेने त्याला मुदतही दिली, मात्र या कालावधीत त्याने एक नवा ढबूही जमा न केल्याने अखेर बुधवारी (ता.19) एल अॅण्ड टी या वित्त पुरठादार कंपनीने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कंपनीच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी मूळच्या निमगाव खैरी (ता.श्रीरामपूर) येथील मात्र सध्या संगमनेरच्या घुलेवाडी शिवारात राहणार्या आरोपी सचिन विजय आढाव याच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 406, 408 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी स्वतःकडे घेतला आहे. बनावट सोनेतारणाच्या एकामागून एक घटना समोर येत असतांना आता चक्क कर्मचार्याकडूनच वित्त पुरठादार कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याने संगमनेरातील अशा कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

