केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून लढवायचीये लोकसभा निवडणूक मुलाखतीमधून व्यक्त केली इच्छा; जिंकून येण्याचाही व्यक्त केला विश्वास

नायक वृत्तसेवा, शिर्डी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्यायमंत्री आहेत. राज्यसभेत खासदार असणारे रामदास आठवले यांची खासदारकीची मुदत 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळे अजून किमान तीन वर्ष तरी ते राज्यसभेचे खासदार असतील. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भात केंद्रातील भाजप नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

रामदास आठवलेंनी या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत. मी कॉलेजच्या जीवनात असतानाच दलित पँथरची चळवळ चालू केली होती. मी त्या चळवळीत कार्यरत झालो. मी 6 महिन्यांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांना कुठलातरी ताप आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. माझ्या आईनं ठरवलं होतं की मुलांसाठी आयुष्य व्यतीत करायचं. त्यांना शिकवून मोठं करायचं. त्यानंतर मी माझ्या मामांच्या गावी सांगलीत राहायचो. मी कॉलेजसाठी मुंबईत आल्यानंतर दलित पँथर चळवळीत सहभागी झालो. तिथून पुढे राजकारणात आलो, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी त्यांच्या पहिल्या मंत्रीपदाचीही आठवण सांगितली आहे. आमच्या पक्षानं काँग्रेससाठी शरद पवारांना समर्थन दिलं होतं. माझ्या पक्षामुळे महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आली. त्यामुळे त्यांनी मला सरकारमध्ये मंत्री बनवलं. समाजकल्याण, वाहतूक, रोजगार हमी अशा जबाबदार्या मला दिल्या होत्या. मी तेव्हा शिकत असतानाच मला अचानक मंत्री बनण्याची संधी मिळाली. मी हॉस्टेलमध्ये राहायचो. हॉस्टेलवरून मी थेट मंत्रालयात गेलो. कमी वयात मी महाराष्ट्रात मंत्री झालो होतो, असं रामदास आठवले म्हणाले.

काँग्रेस आघाडीमध्ये 1998 मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो. 1999 मध्ये दुसर्यांदा झालो. 2004 मध्ये तिसर्यांदा खासदार झालो. चौथ्यांदा शिर्डीतून लढलो तेव्हा हरलो. मला यूपीएच्या काळात मंत्रीपद नव्हतं दिलं. त्यांनी आरपीआयला सत्तेत सहभागी करून घ्यायला हवं होतं. पण सोनिया गांधी, शरद पवारांनी आम्हाला ते दिलं नाही. त्यावर माझं बाळासाहेब ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की शिवशक्तीसोबत भीमशक्ती यायला हवी. त्यानंतर शिवसेना, भाजपासह रिपाइं निवडणुकीत सहभागी झाली. मुंबई पालिका निवडणुका आम्ही जिंकल्या. 2014 ला लोकसभा निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या. विधानसभेत भाजपा, शिवसेनेचं सरकार बनलं. रिपाइंनं त्यात पाठिंबा दिला, अशी माहितीही रामदास आठवले यांनी यावेळी दिली.

शिर्डीतून लढवायचीचे लोकसभा निवडणूक..
आता मी दुसर्यांदा राज्यसभेत आलो आहे. 2026 पर्यंत मी खासदार असेन. पण माझी शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मला तशी संधी मिळाली, तर मी शिर्डीतून निवडणूक लढवेन. मी लोकसभेचा माणूस आहे. बघुयात आता काय होतंय. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांना मी प्रस्ताव दिलेला आहे. पण अजून केंद्रातील नेत्यांशी मी बोललेलो नाही. मला संधी मिळाली तर मी तिथून जिंकून येऊ शकतो, असंही रामदास आठवले म्हणाले.
