आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी संधी शोधावी ः डॉ. कानिटकर जयंती महोत्सवात तरुणाईशी साधला प्रेरणादायी संवाद


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालकांनी मुलींप्रमाणेच मुलांनाही सांभाळले पाहिजे. चांगला समाज व चांगल्या भारतासाठी मुले, मुली दोन्हीही समान असून तरुणांनी आपली आवड ओळखून आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी संधी शोधावी. यामुळे जीवनात यशस्वीतेबरोबर आत्मिक समाधान मिळेल, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात एकविरा फाउंडेशनच्यावतीने घे भरारी प्रेरणा संवादात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर, दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, शरयू देशमुख उपस्थित होत्या.

संगमनेरमधील युवकांशी संवाद साधताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. पालकांनी मुलांनाही मुलींप्रमाणेच सांभाळले पाहिजे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी मुले व मुली दोनही गरजेचे आहे. पालकांनी सातत्याने मुलांशी संवाद करावा. मुलांच्या आवडीच ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच युवकांनी देशसेवा ही प्रत्येक क्षेत्रात आहे असे समजून काम केले पाहिजे. आपण जेथे काम करतो ते काम प्रामाणिकपणे करा. यशस्वी होण्याकरीता स्वतःमध्ये आत्मविश्वासाबरोबर अनुशासन असायला पाहिजे. प्रतिकूलता ही आता कारण असू शकत नाही स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला नवीन काहीतरी करावे लागेल. संस्कार घेऊन आपला देश पुढे जात असून कोरोना काळात प्रत्येक माणूस सैनिक म्हणून घडला असाच मानवतेचा धर्म वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर डॉ. लीना बनसोड म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जो निर्णय घेतला आहे. त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जे काही करणार असाल ते मनापासून करा. स्वतःची ध्येय ठरवा. पैसा व प्रसिद्धीसाठी काम न करता आत्मिक समाधानासाठी काम केले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ही मोठी गुणवत्ता असून स्पर्धा परीक्षांमधून आता ग्रामीण भागातील मुले जास्त पुढे येत आहे. गुणवत्ता असलेल्या तरुणांना नक्कीच मोठे भविष्य असल्याचेही त्या शेवटी म्हणाल्या. प्रास्ताविक कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो युवक युवती उपस्थित होत्या.

Visits: 100 Today: 2 Total: 1105673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *