अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन धनगर समाजाचे प्रश्न, समस्या देखील मार्गी लावणार ः शिंदे

नायक वृत्तसेवा, नगर
धनगर समाजाला भेडसावणार्‍या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, सुहास कांदे, माजी आमदार विजय शिवतारे, जयसिंग शेंडगे, शिवाजी वाटेगावकर, आयोजक माजी नगरसेवक योगेश जानकर, शंकर कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धनगर समाजाच्या सत्काराचा स्वीकार करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोयी-सुविधा योजना लागू करण्यात येईल. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल. आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाड्या-वस्त्यांमध्ये सोयी-सुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य गजढोल आणि नृत्याद्वारे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा विशेष सन्मान धनगर समाजाकडून करण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासह प्रलंबित मागण्या आणि समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील मेंढपाळ बांधवांची चलाई क्षेत्र खुले करते, अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्या नगर करण्याची मागणी नगरसेवक योगेश जानकर यांनी प्रास्ताविक करतानाच केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी शिष्टमंडळ नेमून मार्गी लावू असे आश्वासित केल्याने संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील उपस्थित समाजबांधवांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्याने सभागृह दणाणून सोडला. त्यामुळे या मागण्या लक्षवेधी ठरल्या आहेत. स्वागत सत्कार विद्या तामखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर कोळेकर यांनी केले.

Visits: 143 Today: 2 Total: 1109214

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *