शिर्डीत सर्वधर्मीय एकवीस नवदाम्पत्य विवाहबद्ध साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टचा अक्षय्य तृतीयेनिमित्त उपक्रम

नायक वृत्तसेवा, शिर्डी
सर्व धर्म समभावाची शिकवण देणार्‍या श्री साईबाबांच्या पावन भूमीत साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अक्षय्य तृतीयेला आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळ्याला यंदा 21 वर्षे पूर्ण झाले आहे. आजपर्यंत सुमारे 2 हजार मुलींचे कन्यादान केले असून, यावर्षी 21 नवदाम्पत्य साधूसंतांच्या आशीर्वादाने विवाहबद्ध झाले.

प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2002 साली सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळा सुरू करण्यात आला असून या विवाह सोहळ्याला 21 वर्षे पूर्ण होत आहे. आजपर्यंत 21 वर्षात फक्त सव्वा रुपयांत 2 हजार विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या अभूतपूर्व विवाह सोहळ्याची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचली आहे. तसेच या सोहळ्याची वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी 2022 मध्ये 21 नवदाम्पत्य जोडप्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये 2 जोडप्यांचा विवाह बौद्ध धर्म पद्धतीने तर 19 विवाह हिंदू धर्म पद्धतीने लावण्यात आले.

यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते, प्रभाकर कोते, साईनिर्माणचे विजय कोते, नितीन कोते, दादासाहेब गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, ताराचंद कोते, हरिश्चंद्र कोते, अरविंद कोते, राजेंद्र कोते, गोपीनाथ गोंदकर, दत्तात्रय कोते, दिनकर कोते, उत्तम कोते, मंगेश त्रिभुवन, सलीम शेख, रहीम पठाण, गफ्फारखान पठाण, समीर शेख, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, धनराज कोते, अभिजीत कोते, राम कोते, देवानंद शेजवळ, अजय नागरे, विकास गोंदकर, गणेश कोते, वीरेश चौधरी, फकिरा लोढा, शफीक शेख आदी मान्यवरांसह वर्‍हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळू महाराज यांनी उपस्थित नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याचे आयोजक साईसिध्दी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलासबापू कोते यांनी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याची माहिती दिली. श्री साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या विवाह सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व वरांची घोड्यावरून श्री साईबाबांचे दर्शन करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी वधूवरांना संसारोपयोगी वस्तू व वधूला पैठणी साडी तर वर मुलांंना सलवार कुर्ता याबरोबरच सोन्याचे मणीमंगळसूत्र देण्यात आले. आलेल्या सर्व वर्‍हाडी मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथम 2 विवाह बौद्ध धर्म पद्धतीने निकम आणि गोडगे यांनी मंत्रोच्चार म्हणून पार पाडले. त्यानंतर उर्वरित 19 जोडप्यांचे विवाह हिंदू धर्म पद्धतीने पार पडले असून याचे पौराहित्य लावर यांनी केले. यामध्ये राजस्थान येथील एक जोडपे विवाहबद्ध झाले. प्रास्ताविक हरिश्चंद्र कोते यांनी केले. वधूवरांना श्री साईचरित्र ग्रंथ व सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक बावचे यांच्यावतीने गेल्या 21 वर्षांपासून साईप्रतिमा देण्यात आली. शेवटी आभार अ‍ॅड. बाळासाहेब कोते यांनी मानले.

Visits: 4 Today: 1 Total: 27396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *