पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या ः थोरात संगमनेरातील प्रांताधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यावर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. येणार्या एक-दीड महिन्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्याठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, किरण मिंडे, काशिनाथ गोंदे, शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे, अशोक सातपुते, बी. आर. चकोर, दादासाहेब कुटे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, आनंद वर्पे, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, राजेश तिटमे आदिंसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, काही वर्षांपूर्वी शंभर टँकरची मागणी या तालुक्यात होत होती. अशा कठीण परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीने दुष्काळी परिस्थिती हाताळली. यावर्षी कमी पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्याठिकाणी मागणी असेल त्याठिकाणी तातडीने अधिकारी पाठवून पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या. तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि 20 मजूर कामावर येण्यास तयार असेल तेथे ही तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच तालुक्यात तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी आला असून गावगावच्या पदाधिकार्यांनी तलाव दुरुस्तीची कामे चांगली करून घ्या असेही सांगितले. तहसीलदार अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी आभार मानले केले.
