कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलाची केली हत्या दिघी येथील धक्कादायक घटना; तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील दिघी येथे चितळी रस्त्यावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून करून मुलाला गळफास दिल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. 10) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल होत असताना मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी आरोपीच्या भावाचे राहाते घर पेटवून दिले. सुदैवाने घरात कोणी नव्हते. मात्र आगीत घराचे मोठे नुकसान झाले.

अक्षता बलराम कुदळे (वय 28) व शिवतेज बलराम कुदळे (वय साडेचार वर्षे) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, बलराम दत्तात्रय कुदळे हा पत्नी अक्षता व मुलगा शिवतेज यांच्यासह गोंधवणी येथे राहात होता. तो मिळेल ते काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. लग्नानंतर काही दिवसांतच बलराम व अक्षता यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. दरम्यानच्या काळात त्यांना मुलगा झाला. ते पुन्हा एकत्र राहू लागले. निमगाव खैरी येथे घर घेतले. काही दिवसांनंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले.

रविवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास त्यांच्यात बाचाबाची झाली. बलरामने प्रथम अक्षताच्या डोक्यात कुदळ मारुन तिचा खून केला. त्यानंतर मुलगा शिवतेज याला आंब्याच्या झाडाला गळफास दिला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अक्षदा हिचे वडील प्रकाश ज्ञानदेव बोरावके (रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बलराम दत्तात्रय कुदळे (वय 35) याच्याविरुद्ध खुनाचा, तर दत्तात्रय गुलाब कुदळे (सासरा), जीवन दत्तात्रय कुदळे (भाया), सुजाता जीवन कुदळे (जाव) व सुरेखा दिनू रासवे (नणंद, रा. अहमदनगर) यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना अक्षताच्या माहेरच्या मंडळींनी आरोपीचा भाऊ जीवन कुदळे याचे गोंधवणी येथील राहाते घर पेटवून दिले. परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या अग्निशामक बंबांना पाचारण केले. यावेळी भरलेले गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. सुदैवाने घरात कोणी नव्हते. शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यविधी सासरच्या घरासमोर करण्याचा पवित्रा घेतला. त्यांची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी समजूत काढल्यानंतर त्यांचा राग शांत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *