कृषी धोरणाला विरोध करणार्या काँग्रेसनेच प्रथम ‘मॉडेल अॅक्ट’ आणला ः विखे
कृषी धोरणाला विरोध करणार्या काँग्रेसनेच प्रथम ‘मॉडेल अॅक्ट’ आणला ः विखे
राहाता बाजार समिती आवारात काँक्रिटीकरण आणि डाळींब सेल हॉलचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, राहाता
नव्या कृषी धोरणाला विरोध करणार्या काँग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी ‘मॉडेल अॅक्ट’ आणला. परंतु आता मात्र या नेत्यांना त्याचा सोसोयीस्करपणे विसर पडला असल्याचा टोला माजी कृषी व पणन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी लगावला आहे. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्या कृषी धोरणात शेतकर्यांचे हित पहावे असे आवाहनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार विखे यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचा आणि डाळींब सेल हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुंकूद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, सभापती बापूसाहेब आहेर, नगराध्यक्षा अर्चना कोते, सभापती नंदा तांबे, अॅड.रघुनाथ बोठे, वाल्मिक गोर्डे, ज्ञानेश्वर गोंदकर, अशोक जमधडे, सहाय्यक निंबधक जितेंद्र शेळके, कृषी अधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन कृषी धोरणाचे स्वागत करुन आमदार विखे म्हणाले, या धोरणांमुळे कृषी व्यवसायाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टीचा समावेश या धोरणात असल्याने कृषी व्यवसायात आमुलाग्र बदलांच्या क्रांतीची सुरूवात झाली असल्याचे स्पष्ट करून देशातील विरोधक केवळ आपल्या अस्तित्वासाठी या विधेयकाचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रात डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच या देशात मॉडेल अॅक्ट आणला गेला. त्यावेळी कृषीमंत्री कोण होते हे सर्वांनाच माहीत आहे. राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वायदे बाजार, ऑनलाईन ट्रेडींग आणि खासगी बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी दिली. पण याचा सोयीस्करपणे विसर आता काँग्रेस नेत्यांना कसा पडला असा सवाल उपस्थित करून, विधेयकाला विरोध करताना सभागृहात कोणाची भूमिका काय होती हे संपूर्ण देशाने पाहिले असल्याकडे लक्ष वेधून राज्यात सतेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकप्रकारे विधेयकाला समर्थनच देवून काँग्रेसला तोंडावर पाडले असल्याची टीका आमदार विखे यांनी केली आहे.
कोरोना संकटाच्या काळात राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला असताना सुद्धा राज्य सरकारने कोणतीही मदत शेतकर्यांना केली नाही. उत्पादित माल फेकून द्यावा लागला. शासनाने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करून शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज होती. परंतु निर्णय करणारेच घरात बसले. अधिकार्यांच्या बदल्या करण्यात जेवढी तत्परता दाखवली तेवढी शेतकर्यांसाठी का दाखवली नाही. बाजार समित्या बंद ठेवणारेच आज शेतकर्यांच्या खोट्या प्रेमाचा पुळका दाखवित असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार असून या माध्यमातून स्पर्धा निर्माण होईल, योग्य भाव आणि पारदर्शक कारभारातून शेतकर्यांना आकर्षित करणारी व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन करतानाच राहाता बाजार समितीने लॉकडाऊनच्या काळातही आपले व्यवहार सुरू ठेवून शेतकर्यांना दिलासा दिल्याबद्दल विखे यांनी पदाधिकारी आणि कर्मचार्यांचे अभिनंदन करून, या बाजार समितीने राज्यात आपले वेगळेपण अधोरेखित केल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सभापती बापूसाहेब आहेर, सचिव उद्धव देवकर यांची भाषणे झाली.