केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला द्या! मृतांच्या नातेवाईकांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू


नायक वृत्तसेवा, नगर
कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या वेळी तपास स्थानिक पोलिसांकडे नको तर ‘सीआयडी’कडे द्यावा, अशी मागणी केली जाते. एवढेच नव्हे तर थेट ‘सीबीआय’चीही मागणी केली जाते. अहमदनगरमधील एका गुन्ह्याच्या बाबतीत मात्र उलटी मागणी होत आहे. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘सीआयडी’कडून काढून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी सुरू आहे. यासाठी मृतांच्या नातेवाईकांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. ‘सीआयडी’च्या अधिकार्‍यांनी आरोपींना जामीन मिळावा, यासाठी मदत केल्याचा या आंदोलकांचा आरोप आहे.


सुमारे चार वर्षांपूर्वी महापालिका पोट निवडणुकीच्यावेळी अहमदनगरमधील केडगाव उपनगरात शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांचे हत्याकांड झाले होते. हे प्रकरण न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या गुन्ह्यातील आरोपींना अलीकडेच जामीन मंजूर झाला आहे. यामध्ये आर्थिक उलाढाल झाल्याचे आरोप करीत कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) संबंधित काही अधिकार्‍यांनी आर्थिक हितसंबंधांतून चुकीची कागदपत्रे सादर केली. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर होण्यासाठी मदत झाली, असा आरोप करण्यात आला आहे. या अधिकार्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

मुख्य म्हणजे या हत्याकांडाचा तपास पुण्याच्या ‘सीआयडी’कडून काढून घेऊन अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेकडे म्हणजे ‘एलसीबी’कडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘सीआयडी’च्या काही अधिकार्‍यांची नावेही नातेवाईकांनी घेतली असून त्यांच्यावर आरोपींशी आर्थिक तडतोड करून जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात चांगल्या विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणात संग्राम संजय कोतकर, प्रमोद आनंदा ठुबे, किसन रमेश ठुबे, देवीदास भानुदास मोढवे, अनिता वसंत ठुबे, गणेश रंगनाथ कापसे, नगरसेविका सुनीता संजय कोतकर सहभागी झाले आहेत.

Visits: 162 Today: 1 Total: 1881902

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *