बेलापूर-कोल्हार रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक संतप्त तत्काळ काम पूर्ण करण्याच्या मागणीला नागरिकांतून जोर

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
बेलापूर ते कोल्हार वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.


गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोल्हार-बेलापूर रस्त्याचे काम सुरू असून ते अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याबरोबरच रस्त्याच्या काही भागामध्ये काम पूर्ण झालेले असून काही भागात अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. नगर – मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बेलापूर ते कोल्हार मार्गे राहुरीला वळविण्यात आली होती. दिवसरात्र येथून वाहतूक सुरू होती. त्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. फत्त्याबादमध्ये सद्यस्थितीला काम सुरू असून ते काम पूर्ण नसल्याने एकेरी वाहतुकीने तेथे अडथळा निर्माण होत आहे.

प्रवरा काठावरील जनतेला श्रीरामपूरला कामानिमित्त येण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत आहे. गळनिंब ते कुरणपूर फाट्यापर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बेलापूर – कोल्हार चौकापासून ते एकलहरेपर्यंतचा खडखडीचा रस्ता बनला आहेत. खंडाळा (उक्कलगाव) चौकापासून ते गावापर्यंत येथे ‘रस्त्यात खड्डा कीे खड्ड्यात रस्ता’ अशी बिकट परिस्थिती बनली आहे. काही भागात रस्त्याचे काम पूर्ण होऊन मार्गी लागल्याने थोडा फार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बेलापुरातील कोल्हार चौकाजवळ नाले खोदाईच्या कामाने मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. तेथे दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 80609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *