पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्याच्या दृष्टीने नगरसेवकांनी काम करावे ः पिचड अकोले नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेच्या जनतेने आपल्या कामाची पावती म्हणून पुन्हा संधी दिली. त्या संधीचे सोने करून आपल्या प्रभागात चांगले काम करा की मतदार व पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली पाहिजे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजप व आरपीआय युतीच्या विजयी उमेदवारांचा पक्ष कार्यालयात सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ होते. यावेळी आरपीआय नेते विजय वाकचौरे, अॅड. वसंत मनकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, तालुका सरचिटणीस यशवंत आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सोनाली नाईकवाडी, आरपीआय नेते चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राजेंद्र गवांदे, शंभू नेहे आदिंसह नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब वडजे, शीतल वैद्य, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, वैष्णवी धुमाळ, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, कविता शेणकर, सागर चौधरी, तमन्ना शेख आदी नगरसेवक उपस्थित होते. तसेच प्रकाश साळवे, विजय पवार, मोसीन शेख, हुसेन शेख, अमोल वैद्य, परशुराम शेळके, रवींद्र शेणकर, बबलू धुमाळ, नवनाथ मोहिते, सौरभ देशमुख, देविदास शेलार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार पिचड म्हणाले, आपल्या प्रभागात केलेल्या विकासकामांची, उर्वरित विकासकामांची यादी तयार करावी, किमान आठवड्यातून प्रभागात फिरून मतदारांच्या गाठी भेटी घेवून प्रभागातील प्रश्नांची माहिती करून घ्यावी. त्यासाठी नोंदवही ठेवावी, वरिष्ठांशी संपर्क साधावा, सोडविलेल्या प्रश्नांची नोंद ठेवावी, नागरिकांनी प्रत्यक्ष काम करणार्या नगरसेवकाला पुन्हा निवडून दिलेले आहे. मासिक बैठक घेण्यापूर्वी आपल्या गटाची सभा घ्यावी, त्यामध्ये प्रश्न मांडावे, त्यानुसार बैठकीचा अजेंठा बनवावा, अभ्यास करून बैठकीला जावे आणि गटनेत्याला सर्वांनी सहकार्य करावे. ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीत काही आश्वासने दिली, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. निळवंडे धरणावर जाऊन 32 गाव अकोलेच्या पाणी पुरवठा योजनेची माहिती घ्यावी, त्यानंतर जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी बैठक करावी. घरे नावावर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, केंद्राचा निधी आणण्यासाठी प्रस्ताव द्यावे, असे सांगितले. तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याचे आरपीआय नेते विजय वाकचौरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका सरचिटणीस यशवंत आभाळे यांनी केले. तर आभार राहुल देशमुख यांनी मानले.
अकोले नगरपंचायत भाजप आघाडीच्या गटनेतेपदी बाळासाहेब वडजे यांची दुसर्यांदा निवड करण्यात आली. तर भाजप आघाडीच्या अध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी, उपाध्यक्षपदी प्रतिभा मनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पक्षाच्यावतीने फेटा बांधून व शाल देऊन सत्कार करण्यात आला.