राजकारणातील सज्जन व्यक्तीमत्व म्हणजे स्व. गोविंदराव आदिक ः अॅड. मनकर महालक्ष्मी विदयालयात गोविंदराव आदिक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नायक वृत्तसेवा, अकोले
स्वर्गीय गोविंदराव आदिक जाण्याने शेतकर्यांचे दु:ख वाढले. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न सोडवणारे नेते उरले नाहीत म्हणूनच राजकारणातील सज्जन, देखने, कोणालाही न दुखावणारे व्यक्तीमत्व म्हणजेच स्वर्गीय गोविंदराव आदिक होते, असे प्रतिपादन अगस्ति रूरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. वसंत मनकर यांनी केले.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. मनकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोले वकील संघाचे अध्यक्ष अॅड. के. बी. हांडे, अॅड. भाऊसाहेब गोडसे, माजी उपसरपंच तथा संस्था कार्यकारिणी सदस्य बबन आभाळे, उपाध्यक्ष नामदेव लगड, जगन्नाथ आभाळे, सावळेराम बंगाळ, नामदेव काळे, प्राचार्य सुनील धुमाळ यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना अॅड. मनकर म्हणाले, आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, शेतीमालाला हमीभाव नाही. शासकीय योजना तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाहीत. जखम पायाला, मलमपट्टी मात्र डोक्याला अशी अवस्था पाहायला मिळत असल्याचे मत व्यक्त करून स्व. आदिक यांनी 11 कलमी सनद राबवली. महाराष्ट्र कृषक संघटनेची स्थापना केली. मात्र काळाच्या ओघात संघटना लोप पावली. त्यामुळ शेतकर्यांच्या समस्या निर्माण झाल्याचे दु:ख व्यक्त केले. काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोर्याप्रमाणे असते. दिसणे महत्वाचे नसून असणे म्हत्वाचे असते. त्याप्रमाणे स्व.गोविंदराव आदिक यांनी शेतकर्यांच्या दृष्टीने विधायक कामे केली. त्यामुळे जगणे सुंदर होते, मरणही सुंदर होत गेले. दैनंदिन जिवनात कायद्याचे शिक्षण महत्त्वाचे असून वकील चांगल्यासाठी खोटे बोलतात, न्यायासाठी झगडतात. युक्तीवादाचे फलित न्याय मिळविणे हेच असल्याचे अॅड. हांडे म्हणाले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक तथा कबड्डी असोसिएशनचे राज्यपंच अनिल चासकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सुनील धुमाळ यांनी केले. रामदास कासार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
