महावितरणने कृषीपंपांची वीज खंडित करण्याची मोहीम थांबवावी! अन्यथा तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाचा संजय सदाफळ यांचा इशारा
नायक वृत्तसेवा, राहाता
महावितरण कंपनीने राहाता परिसरातील शेतकर्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरीत थांबवावी. अन्यथा शेतकरी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सदाफळ यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीमालाची विक्री करण्यासाठी चांगले बाजारभाव मिळाले नाहीत. परिणामी शेतकर्यांची मोठी आर्थिक हानी झाली. राहाता परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यावर अनेक कुटुंबियांची उपजीविका चालते. बाजारपेठेचे अर्थकारणही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकर्यांनी हरभरा, गहू मका ही पिके शेतामध्ये पेरली आहेत. तसेचऊस, पेरू, चिकू, डाळिंब, द्राक्षे या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊननंतर शेतीमालाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या हेतूने रब्बी हंगामासाठी शेतकर्यांनी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागत व बी खरेदी करून शेतामध्ये रब्बी पिकांची पेरणी केली असून बियाणे उगवण्यासाठी शेतकर्यांची दिवस-रात्रीची पर्वा न करता शेतीमालाला पाणी देण्याचे काम करीत आहे.
राहाता परिसरात जवळपास 60 टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषीपंपांची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया जाते की काय, अशी भीती शेतकर्यांना वाटू लागली आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरीत थांबवली नाही तर आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असे संजय सदाफळ यांनी म्हटले आहे.