जांबुत बुद्रुकचे ग्रामस्थ वाळूतस्करी विरोधात एकवटले

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील वैतागलेले ग्रामस्थ वाळू तस्करीच्या विरोधात एकवटले आहेत. अवैधरित्या होणारा वाळू उपसा त्वरीत बंद करावा, यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता.22) दुपारी घारगाव पोलिसांना निवेदन दिले.

अवैध वाळू उपशामुळे जांबुत परिसरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना शालेय विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी का दुर्लक्ष करत आहे? असा सवालही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केला आहे. अवैध होणारा वाळू उपसा बंद व्हावा म्हणून अनेकदा मागणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे यांना निवेदन दिले. त्यानंतर आता पोलीस वाळूतस्करांवर काय कारवाई करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
