केंद्रीय मंत्री आठवलेंनी घेतली खेडकर कुटुंबियांची भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (ता.8) सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कोरोना काळात मृत्यू झालेल्या सदस्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, केंद्र असो अथवा राज्य सरकार तमाशा कलावंत यांना मदत मिळणे हे महत्त्वाचे आहे. त्यात राज्य सरकारची जबाबदारी अधिक आहे. तमाशा फड केवळ महाराष्ट्रात असून राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तात्काळ मिळणे गरजेचे आहे. तुटपुंजी मदत देऊन खूप मोठा आधार तमाशा कलावंतांना मिळणार नाही. मी सुद्धा माझ्या एका महिन्याच्या पगारातून तमाशा कलावंतांना मदत दिली होती. राज्य सरकारकडून तमाशा कलावंतांना भरीव मदतीची गरज असून त्याचबरोबर छोट्या-मोठ्या उद्योगपतींनी देखील यासाठी पुढे आले पाहिजे आणि केंद्राकडून देखील मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर ईडीच्या कारवाईवर बोलताना म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ईडी हा स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळे अजित पवार यांची मुद्दाम चौकशी केली जाते आहे असे नाही. शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लखमीपूरमध्ये घडलेल्या घटननेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील असून या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर झाली आहे. मात्र झालेली घटना दुर्देवी आहे असे नमूद केले.

Visits: 371 Today: 1 Total: 1597754

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *