राहाता तालुक्यात वन्यजीवांचा उच्छाद; पिकांचे मोठे नुकसान शेतकर्‍यांची वन विभागाकडे पंचनामे करुन आर्थिक मदतीची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यात हरिण, रानडुकरे, काळवीट आदी वन्यजीवांनी उच्छाद घातल्याने सोयाबीन, घास, मका, फळबागा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, वन विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

राहाता तालुक्यातील एकरुखे, नपावाडी, रामपूरवाडी, पिंपळवाडी, जळगाव, पुणतांबा याबरोबरच शहराच्या पूर्व भागात हे वन्यप्राणी सोयाबीन, मका, घास, डाळिंब, आंबा, पेरू, चिकू, सीताफळ व इतर सर्वच शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काळवीट व रानडुकरे त्यांच्या डोक्याच्या साहय्याने फळबागांची मोडतोड करत आहेत. हरिण, काळवीट, रानडुकरे यांचा मोठा समूह रात्रीच्यावेळी एकत्र येऊन शेतमाल फस्त करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने तत्काळ वन्यजीवांपासून शेतकर्‍यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. वन्य प्राण्यांबरोबरच शंखी गोगलगायीपासून देखील पिकांची मोठी हानी होत आहे.

सोयाबीन व भाजीपाला पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिकांवर औषध फवारणी करूनही त्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात आपला शेतीमालाची विक्री करावी लागली. यावर्षी चांगल्याप्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करत आहे. गोदावरी आवर्तन लांबणीवर गेल्याने सोयाबीन, मका, फळबागा व इतर पिके धोक्यात आली आहेत. या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारे शेतमालाचे नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने तत्काळ वन्यजीवांपासून शेतमालाच्या होणार्‍या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 30673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *