काळे-जगताप यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अहमदनगर शहरातील वितुष्ट वाढत चालले आहे. आता तो वाद आणखी विकोपाला गेला आहे. येथील आयटी पार्कच्या निमित्ताने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील वादाला जाहीर तोंड फुटले. जगताप यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी काळे यांनी आयटी पार्कला भेट दिली. मात्र, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. नंतर दोघांनी पत्रकार परिषदा घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळत एकमेकांना आव्हान दिले.

जगताप यांनी निवडणूक प्रचारात आयटी पार्क मध्ये कंपन्या आणू आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. ते खोटे असल्याचे दाखवून देण्यासाठी काळे यांनी गुरुवारी (ता.2) तेथे जाऊन पाहणी केली. मात्र, त्यानंतर त्यांना गुन्ह्याला सामोरे जावे लागले. यासंबंधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आयटी पार्कमधील पाहणीचे चित्रिकरणच त्यांनी पत्रकारांना दाखविले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या दबावाला बळी पडून आमच्यावर विनयभंग, शिवीगाळ, धक्काबुक्कीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांमार्फत खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा शहराच्या विकासकामांकडे लक्ष द्यावे. आयटी पार्कच्या मुद्द्यावर समोरासमोर येऊन चर्चा करावी. खोटे गुन्हे दाखल करण्याची त्यांची जुनीच सवय आहे. आम्ही या रावणरूपी गुंडांचे दहन माजी आमदार अनिल राठोड यांच्या विचारातून करणार आहोत. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांनाही हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार आहोत. त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज याची पडताळणी करून ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ लवकरच होईल आणि नगरकरांसमोर सत्य काय आहे ते येईल.’ असे काळे म्हणाले.

आमदार जगताप यांनीही त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, ‘आयटी पार्कची इमारत वीस वर्षे धूळखात पडून होती. तेथे उद्योग आणण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर एमआयडीसीने त्यावरील आयटी पार्कचा दर्जा रद्द करत इतर प्रकारच्या उद्योगांना तेथे भाडेतत्वावर जागा दिल्या. मात्र, आयटी पार्क सुरू करण्यासाठी मी 2016 पासून प्रयत्न करीत होतो. खासगी खर्चातून दुरूस्ती केली. स्टार्टअप सुरू करण्यास कंपन्यांना निमंत्रण दिले. आम्ही नगरच्या तरुणाईला काम मिळावे म्हणून प्रयत्न केले तर त्याचा त्रास आता काहींना होत आहे. आयटी पार्कची इमारत म्हणजे राजकीय व्यासपीठ किंवा पक्ष कार्यालय नाही. बदनामी करून सुरू असलेले काम बंद पाडण्याचे कारस्थान आहे. त्यापेक्षा आपले कर्तृत्त्व दाखवून चांगले व लोकोपयोगी कामे करावीत,’ असे आव्हान जगताप यांनी काळे यांचे नाव न घेता दिले. आयटीपार्कमध्ये जाऊन गोंधळ करणारे उठसूट माझ्यावर आरोप करत असतात. आम्ही कधीच त्यांच्या आरोपांना भीक घातली नाही. त्याकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. मात्र आयटी पार्क संदर्भात करण्यात आलेले आरोप नगरच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे यात लक्ष घालत असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

Visits: 91 Today: 1 Total: 1114455

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *