राहुरीतील तनपुरे साखर कारखाना प्रवेशद्वारावर कामगारांचा ठिय्या आश्वासन देऊनही थकीत पगार न मिळाल्याने उपसले आंदोलनाचे हत्यार

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही थकीत पगार न मिळाल्याने सुमारे 250 कामगारांनी मुख्य प्रवेशद्वारावर जमा होत न्याय हक्कांसाठी तीव्र आंदोलन करून ठिय्या दिला. तसेच साखर कामगार यूनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांना सर्वांनी हात वर करून पदावरून दूर करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.

साखर कामगार सोसायटीचे माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही कामधेनू सुरू रहावी, सुरळीत चालावी, यासाठी संचालक मंडळास सहकार्य करत आलो आहे. मात्र, व्यवस्थापनाने कामगारांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अनेकदा मदत केली. मात्र, संचालक मंडळाने आमच्या पदरात काहीच टाकले नाही. प्रत्येकवेळी कामगारांनीच त्याग करायचा का? कामगार उपाशीपोटी राहून सहकार्य करतात, याची जाणीव राहिलेली नाही.

कामगार वसाहतीमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारात आहे, याला कोणी वाली आहे की नाही? आता कामगारांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत कायदेशीर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या निर्णयाला सर्व कामगारांनी हात वर करून संमती दिली. सचिन काळे यांनी कारखाना बंद असल्यापासून कामगार आपल्याला न्याय मिळेल, या आशेवर आहेत. मात्र आता अपेक्षा करणे शक्य नाही, असे सांगितले. यावेळी सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, संदीप शिंदे, सुरेश तनपुरे, सुभाष कटारे, रावसाहेब खांदे, विठ्ठल धुमाळ, सुरेश आदमाने, संजय पवार, बाळासाहेब खपके, शिवाजी नालकर, बाळासाहेब विटनोर आदिंसह सुमारे 250 कामगार उपस्थित होते.

Visits: 191 Today: 1 Total: 1848607

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *