जलसंधारण खात्यात साडेसहाशे कोटींचा गैरव्यवहार ः मुरकुटे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला; राजीनाम्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर नेवासा तालुक्यातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘गडाख मुंबईच्या एसी ऑफिसमध्ये बसून कारभार चालवत असल्याने त्यांना शेतकर्यांचे दु:ख कळत नाही. जलसंधारण खात्यात गडाख यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला आहे. याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे.

पावसाने ताण दिल्याने नेवासा तालुक्यातील शेतकर्यांसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मुरकुटे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गडाख यांच्यावर आरोप केले. काही दिवसांपूर्वीच गडाख यांच्या समर्थकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याऐवजी गडाखांना जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी केली होती. गडाख यांनी ही कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे प्रतिस्पर्धी मुरकुटे यांनी थेट आरोप केले आहेत.

मुरकुटे यांनी म्हटले आहे की, ‘शेतकर्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमच्या सरकारच्या काळात मुळा धरणात पाणीसाठा कमी असतानाही अशा काळात पाणी सोडले जात होते. आता धरणात पुरेसा साठा असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वत:ला पाणीदार नेता म्हणवून घेणार्या गडाखांनी संकटाच्या काळात शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. भाजपचे सरकार आणि मी आमदार असताना याच गडाखांनी रस्त्यावर येऊन स्टंटबाजी केली होती. आता तर ते राज्याच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकर्यांचा पाणीदार नेता? शेतकर्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात त्यासाठी मतदारसंघात शेतकर्यांशी संवाद साधावा लागतो. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकर्यांसाठी आवर्तन सोडावे,’ असंही मुरकुटे म्हणाले.
![]()
दरम्यान, मुरकुटे यांनी जलसंधारण विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अभिरूप अधिवेशनात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जलसंधारण विभागातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड केला होता. त्याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा दिला पाहिजे,’ अशी मागणीही मुरकुटे यांनी केली.

