मानोरी-केंदळ पुलाचे काम लवकर करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी-केंदळ मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या पुलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ नवीन पुलाचे काम सुरू करावे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा केंदळ ग्रामस्थांनी दिला आहे.

मानोरी-केंदळ खुर्द-केंदळ बु.-चंडकापूर (ता.राहुरी) आदी गावांना जोडणारा मुळा नदीवरील हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाला आहे. या पुलाची मर्यादा देखील अनेक दिवसांपासून संपलेली आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. सद्यस्थितीत पूल कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरी देखील याठिकाणाहून धोकादायक वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथील ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. तरीही अद्याप नवीन पुलाचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर काम सुरू करावे, अन्यथा आगामी काळात आंदोलन छेडले जाईल असा इशारा सरपंच मच्छिंद्र आढाव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव, माजी सरपंच संदीप आढाव, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र आढाव, बाबासाहेब भोईटे, अनिल आढाव, पंढरीनाथ आढाव, शिवाजी गुंजाळ, शिवाजी आढाव, रामदास तोडमल, बाळासाहेब आढाव, मधुकर मगर, वैभव जरे, सचिन जरे, भाऊसाहेब आढाव आदिंसह केंद्रळ खुर्द येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Visits: 154 Today: 1 Total: 1778901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *