युवक काँग्रेस व एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत


नायक वृत्तसेवा, संगमनेर 
 माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशनच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किराणा, वापरावयाच्या वस्तू, शालेय व इतर उपयोगी साहित्य पाठवण्यात आले.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून मदतीचे साहित्य घेऊन ट्रक रवाना झाला. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मुख्याधिकारी किशोर भांड,रामदास तांबडे, युवक काँग्रेसचे डॉ विजय पवार, शरद पावबाके,नामदेव कहांडळ, संदीप गोपाळे,  सतीश कासार, अंबादास गुंजाळ,दीपक शिंदे,रामेश्वर पानसरे, सत्यजित थोरात, अरुण थोरात, संदीप यादव, हौशीराम खेमनर, प्रीतम बिडवे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर बिहारमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बिहारमधून येऊन मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. याचबरोबर  जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. या नुकसानीची पाहणी केली. याचबरोबर तातडीने सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह मदत करावी अशी आग्रही मागणी केली.नुकसानग्रस्तांच्या भेटीनंतर त्यांना तातडीने मदत मिळावी याकरता अमृत उद्योग समूहाच्या वतीने मदत पाठवण्यात आली. याचबरोबर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी व व्यापारी यांना या नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.

या मदतीनंतर विविध नागरिक व कार्यकर्ते व्यापारी यांनी पूरग्रस्तांसाठी वापरावयाचे कपडे, चटई, अंथरून, पांघरून, गृहपयोगी साहित्य, किराणा, साखर,तूप, शेंगदाणे, तेल,पोहे, याचबरोबर गहू, बाजरी, तांदूळ हे धान्यही दिले. अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले. याचबरोबर मेडिकल साहित्यही अनेकांनी दिले आहे. हे सर्व साहित्य यशोधन कार्यालयात जमा करून यानंतर भरलेल्या ट्रक हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील विविध गावे व जालना जिल्ह्यामधील विविध गावांमधील नुकसानग्रस्तांना पाठवण्यात आला आहे. रामदास तांबडे, विजय पवार यांच्यासोबत युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी या ठिकाणी रवाना झाले.

महाराष्ट्रातील नागरिकांवर नैसर्गिक आपत्ती आल्यावर संगमनेर तालुक्याने  बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कायम मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ यांसह कोरोना संकट काळातही संगमनेर तालुक्याने अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली होती. आता झालेल्या मोठ्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत मिळावी याकरता तालुक्यातील नागरिकांनी जे जे शक्य आहे. ते साहित्य स्वखुशीने या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मदतीचा वारसा तालुक्याने कायम जपला असल्याचे डॉ.जयश्री थोरात यांनी सांगितले.
Visits: 51 Today: 3 Total: 1105456

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *