‘अमृतवाहिनी’ला ऊर्जा व्यवस्थापन व बचतीसाठी राष्ट्रीय सुवर्णचषक
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उच्च गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकने, आधुनिक व अद्ययावत सुविधांसह स्वच्छ व हिरवा परिसर असणार्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे यांच्याकडून ‘ऊर्जा संवर्धन 2021’ या राष्ट्रीय पातळीवर आयोजित स्पर्धेमध्ये सुवर्णचषक पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

विविध नामांकित राष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूहांकडून सहभाग नोंदविण्यात आला होता. यामधून अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 400 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प, 5 किलोवॅट हायब्रीड सौर पवन ऊर्जा प्रकल्प तसेच मायक्रोप्रोसेसर बेस्ट ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल यूनिट कार्यान्वित करण्यात आले. याद्वारे महाविद्यालयाची विजेची गरज भागत असून त्याद्वारे विद्युत महामंडळास शिल्लक असलेली वीज निर्यात करण्यात आली. परिसरामध्ये 1000 किलो क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाद्वारे महाविद्यालयीन पालापाचोळा उपहारगृहातील टाकाऊ पदार्थ आणि घनकचरा व्यवस्थापन होऊन त्याद्वारे ऊर्जा निर्मितीचे साधन तयार झालेले आहेत. महाविद्यालयातील वसतिगृहांसाठी बसवलेल्या 41 हजार लिटर क्षमतेच्या सोलर वॉटर हिटरच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचे मोठे काम करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 487 यूनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस निर्यात केली आहे. सदर प्रकल्प इतर शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये आदर्श ठरत आहे. याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त बाजीराव खेमनर, शरयू देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, लक्ष्मण कुटे, भाऊ थोरात, अॅड. आर. बी. सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉक्टर व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी धुमाळ, रजिस्टर प्रा. व्ही. पी. वाघे, डॉ. गुरव, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. विष्णू वाकचौरे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. सुनील कडलग यांनी प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. रवींद्र गिते, प्रा. सौरभ इंगळे आणि प्रा. रितेश पाटील व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

