लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाले म्हणून निष्काळजीपणा नको ः थोरात संगमनेर तालुक्यात 81 गावे कोरोना मुक्त तर 31 गावांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रुपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसरी लाट ओसरु लागल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाले असले तरी कोणीही निष्काळजीपणा करू नका, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे तालुका व शहरातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषद सभापती मीरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, सीताराम राऊत, निखील पापडेजा, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ.संदीप कचेरिया, डॉ.राजकुमार जर्‍हाड, डॉ.सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री थोरात पुढे म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून कोरोनाची रुग्णवाढ कमी होत आहे हे आनंददायी आहे. मात्र लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करणे केले पाहिजे. कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा. आणि लक्षणे असणार्‍यांचे विलगीकरण करावे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोना मुक्त झाली असून संपूर्ण तालुका लवकरात लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी निर्बंध शिथील झाले असले तरी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

Visits: 109 Today: 1 Total: 1421480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *