अस्तगावातील गोदावरी कालव्यावरील पूल बनला धोकादायक नागरिकांचा जीव मुठीत धरुन प्रवास; पावसाळ्यापूर्वी काम करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील अस्तगाव येथील गोदावरी कालव्यावरुन ये-जा करण्यासाठी असणारा लोखंडी पूल पुरता जीर्ण झाला असून धोकादायक बनला आहे. त्यातच पावसाळा जवळ आलेला असताना आता हा पूल केव्हा होणार, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पठारे यांनी केला आहे.

अस्तगावच्या गावठाणालगत गोदावरीचा उजवा कालवा वाहतो. गावठाणाच्या दोन्ही बाजूंनी दोन ओढे वाहतात. त्यामुळे ब्रिटीशांनी ही परिस्थिती पाहून त्याकाळच्या अभियंत्यांनी गावानजीक सात मोर्या कालव्याला केल्या. यामुळे पावसाळ्यात दोन्ही बाजूंनी येणारे पाणी या मोर्यांखालून वाहत जाते. या सात पैकी एक किंवा दोन मोर्या या पूर्व बाजूला राहणारे रहिवासी गणेशनगर, रांजणगाव, एकरुखे व त्या दिशेच्या व पश्चिम बाजूचे आडगाव, पिंप्रीनिर्मळ, खडकेवाके आदी गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उपयोगी येतात. या मोर्यांखालूनच रस्ता आहे. मध्यंतरी जलसंपदा विभागाने या मोर्यांचे मजबुतीकरण केले. त्यामुळे त्यांची उंची अजूनच कमी झाली. वाटसरु, सायकलस्वार सहजगत्या जातात. मात्र चारचाकी वाहनांना कायमच अंदाज घेऊनच मोर्यांखालून जावे लागते.

या मोर्यांखालून सातत्याने ये-जा चालू असते. या मोर्यांच्या दोन्ही बाजूंनी डांबरी रस्ते आहेत. पावसाळ्यात शाळकरी मुलांपासून वाहनांना व इतर सर्वांनाच गुडघ्या इतक्या पाण्यातून वाट काढावी लागते. पावसाळ्यात या सातही मोर्या निम्म्याहून अधिक क्षमतेने वाहतात. त्यामुळे त्या भागातील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो. या पूरस्थितीमुळे मोर्यांवरुन एखादा पूल असावा अशी अनेक दिवसांची मागणी आहे. जलसंपदा विभागाने दीड किलोमीटर अंतरावर पूर्वीपासून एक पूल बांधलेला आहे. दोन पुलात किमान तीन किलोमीटरचे अंतर असावे, असा जलसंपदाचा फतवा आहे. त्यामुळे हा पूल रखडला आहे. त्याचा मोठा फटका रहिवाशांना बसत आहे. अस्तगाव-वाकडी हा जुना रस्ता नकाशावर आहे. या रस्त्यांना जोडण्यासाठी किमान पुलाची आवश्यकता आहे. तिथेही पूल झाल्यास ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होवू शकते.

या सातमोर्यांजवळ एक पादचारी पूल जलसंपदाने बांधला होता. तत्कालिन जलसंपदा राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या प्रयत्नांतून हा पूल करण्यात आला होता. या पुलावरुन किमान पादचारी जातील, असा त्यामागचा हेतू होता. परंंतु गेल्या 7-8 वर्षांपासून हा पूल कमालीचा वाकला आहे. तो चालण्यास अयोग्य झाला आहे. किमान सातमोर्यांजवळ दशक्रियाविधी पार पडतात, तेथे जल संपदाने लोखंडी पूल उभारावा अशीही मागणी होत आहे.
![]()
सदर लोखंडी पूल जीर्ण झाल्याने अपघात होण्याची भीती असल्याने आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याठिकाणी नवीन पूल होण्यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने सर्व्हेही केला आहे. काम होणार असून आमदार विखे-पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक प्रमोद रहाणे यांनी स्वत: याची पाहणी केली आहे.
– वाल्मिक गोर्डे (संचालक-बाजार समिती, राहाता)
