पोलिसांवरील भ्याड हल्ला सुसंस्कृत संगमनेरला कलंक ः जाखडी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी (ता.6) संगमनेरमधील तीनबत्ती चौकात जमावाकडून पोलिसांवर झालेला हल्ला म्हणजे शांतताप्रिय व सुसंस्कृत संगमनेर शहराला लागलेला कलंक आहे. अविचारी जमावाने केलेल्या या भ्याड हल्ल्याने संगमनेरची मान शरमेने खाली झुकली आहे. भविष्यात अशाप्रकारे पोलीस बांधवांवर हल्ले होऊ नयेत म्हणून या प्रकरणातील सर्वच्या सर्व दोषींना जेरबंद करून कठोर शासन व्हावे. या दृष्टीने गंभीरपणे प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कर्तव्य बजावत असताना काही मूठभर अविचारी लोकांच्या बेबंद जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य जराही विचलित होऊ नये; यासाठी पुरोहित संघाने कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना आपला सदैव भक्कम पाठिंबा राहील असे पत्रकात म्हंटले आहे. शहराची शांतता भंग करण्याचा गुन्हा करणारे कोणीही असोत त्यांना धडा शिकविला म्हणजे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत असे पत्रकात म्हंटले आहे.

Visits: 139 Today: 1 Total: 1917085

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *