लोकसहभागातून जलसंवर्धन झाल्यास गावे समृद्ध होतील ः थोरात पारेगाव खुर्द येथे पाणलोट क्षेत्र विकासातून विविध कामे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर ग्रामीण भागासह शहरी भागात समृद्धी निर्माण होते. पाणी बचत हीच पाणी निर्मिती असून जलसंवर्धन व संधारण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लोकचळवळ महत्वाची असून यामुळेच गावे समृद्ध होतील असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पारेगाव खुर्द येथे क्रॉम्प्टन ग्रीव्हज सीएसआर फंड वनराई संस्था आणि जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ.सुधीर तांबे, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, आकाश शिंदे, अॅड.अजित वाडेकर, चंद्रकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, अजय फटांगरे, बाबा ओहोळ, बी.आर.चकोर, बाबासाहेब कांदळकर, अॅड.सुहास आहेर, कैलास गोडकर, सखाराम शेरमाळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, पारेगाव खुर्दमध्ये सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन केलेली विविध कामे उल्लेखनीय आहे. जलसंवर्धनाचे व जलसंधारणाचे काम वनराई व संस्थेच्या माध्यमातून याठिकाणी होत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि फादर बाखर यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये पाणलोटाचा मोठा कार्यक्रम राबविला गेला. विविध गावांमध्ये या अंतर्गत आजही कामे चालू आहेत. प्रत्येक पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत जिरला पाहिजे, जिरवला पाहिजे. पाणी बचत हीच पाणी निर्मिती आहे. यापुढील काळात पाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून पाणी स्वावलंबनासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे आहे. गावातले पाणी गावात जिरवा, गट तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र या. जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीचा वापर शेतकर्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार डॉ.तांबे म्हणाले, पारेगाव खुर्दमध्ये क्रॉम्टन सीएसआर फंड वनराईच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल असा विश्वास आहे. वनराईचे रवींद्र धारिया म्हणाले, महात्मा गांधी म्हणाले होते की खेड्याकडे चला. खेडी स्वयंपूर्ण झाली तर देश स्वयंपूर्ण होईल. संगमनेर तालुक्यातील खेडे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत मजबूत आहे. येथील सहकार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून पारेगाव खुर्दमध्ये आपण अधिकाधिक चांगले काम करून पारेगाव हे मॉडेल बनवा असे ते म्हणाले. संस्थेचे सचिव अमित वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात यांनी केले तर सरपंच सखाराम शेरमाळे यांनी आभार मानले.
