शांती फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर कारभारी उगले व सूर्यकांत शिंदे मानकरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील शांती फाउंडेशन यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला परिवर्तन पुरस्कार ज्येष्ठ कामगार नेते कारभारी उगले व नाट्यकलावंत सूर्यकांत शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर गुणवत्ता पुरस्कार हर्षदा वर्षे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी दिली आहे.

डॉ.सोमनाथ मुटकुळे व चिकणी येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप व संजय मुटकुळे यांच्या मातोश्री चंद्रभागा मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य अशा क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्याला पुरस्कार देण्यात येणार येता. यावर्षी विडी कामगार चळवळीसाठी अखंड आयुष्य समर्पित भावनेने काम करणारे व समाजातील विविध चळवळीसाठी सातत्याने भूमिका घेणारे कॉम्रेड कारभारी उगले यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षकी पेशा माध्यमातून ज्ञानदानाचे काम करण्याबरोबर समाजात पुरोगामी विचारांची धारा नाट्य चळवळीच्या माध्यमातून जागविण्यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे सूर्यकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मान पत्र असे आहे. चिकणी येथील भारतीबाबा विद्यालयाची दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थिनीला गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. त्या मुलीला दोन हजार पाचशे रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी विद्यालयात हर्षदा दत्तात्रय वर्पे हिची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार समिती अध्यक्ष म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सदस्य पत्रकार संदीप वाकचौरे, माधवी देशमुख, शिवानी मुटकुळे, दीप्ती घुले यांचा समावेश आहे.
