संगमनेर शहरात प्रथमच दुचाकींना ‘रिफ्लेक्टर’

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासनाकडून चालू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’निमित्त संगमनेर शहरात प्रथमच दुचाकींना रिफ्लेक्टर लावण्यात आले. दरम्यान, हा सप्ताह दरवर्षी जानेवारी शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यात येतो, अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मोटार वाहन निरीक्षक निमसे म्हणाले, सर्वांना वाहतुकीचे नियम माहित असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहनांची काळजी घेऊन कागदपत्रे जवळ बाळगावेत आणि रिफ्लेक्टर लावावेत असे सांगून श्रीरामपूर परिवहन विभागात संगमनेरमध्ये आज सुरूवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही तालुक्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येणार आहे. चारचाकी वाहनांना रात्री-अपरात्री प्रतिबंध असताना तद्वतच काही वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याबाबत प्रश्न केला असता निमसे म्हणाले, कोणत्याही वाहनास परिवहनास प्रतिबंध नाही. मात्र त्या वाहनाने वाहतुकीचे नियम पाळून अपघात न होण्याची काळजी घेत वेगमर्यादा पाळावी, मालवाहू वाहन परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे, कर, विमा, वाहनाची पात्रता, आदिंविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. वाहतुकीच्या नियमांबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह होत असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.
