… अखेर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब! दोन-तीन दिवसांत होणार अधिकृत घोषणा; विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याविषयी मोठी चर्चा पहायला मिळत होती. यामध्ये विद्यमान मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव यांच्यासह विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसकडून राज्यासाठी आक्रमक चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्यानुसार विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अटकळ काही राज्यातल्या नेतेमंडळींनी बांधली होती. मात्र, दिल्लीमध्ये पार्टी हायकमांडच्या चर्चेनंतर नाना पटोलेंच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एबीपीने दिले आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत नाना पटोलेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मित्रपक्ष शिवसेनेविरोधात उघड भूमिका घेताना आक्रमक दिसले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच कायम राहावं यासाठी थोरात आक्रमक झाल्याचं देखील काहींचं म्हणणं होतं. मात्र, दिल्लीहून नाना पटोलेंचं नाव निश्चित करण्यात आल्याचं आता समजतंय. यासाठी त्यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, महाविकासआघाडी सरकारकडे बहुमत असल्यामुळे पुढील हंगामी अध्यक्ष आणि पूर्णवेळ अध्यक्ष देखील महाविकासआघाडीचाच असणार आहे.

दरम्यान, येत्या काही काळात राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसची सूत्र हाती घेण्याची शक्यता असून त्यासाठीच राजीव सातव यांच्या नावाची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी वर्णी लागली नसल्याचं सांगितलं जात आहे. राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी असून राहुल गांधींच्या गोटातले मानले जातात. त्यामुळेच राहुल गांधींना राजीव सातव यांनी पुढील काळात राज्यात न जाता दिल्लीतच राहावं अशी इच्छा व्यक्त केल्याचं देखील दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

 

Visits: 125 Today: 1 Total: 1802396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *