मामा भाच्यांचा खाणीतील डबक्यात बुडून दुर्दैवी अंत! झोळे शिवारातील घटनेने अवघ्या तालुक्यात हळहळ…

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यातील झोळे गावा अंतर्गत असलेल्या गणेवाडी येथील खानीच्या पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी  घटना आज घडली. सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल समोर येत असल्याने त्याची धांदल सुरू असताना सदरची घटना समोर आल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयुर संतोष गाढवे (वय वर्षे १२) व सुरज संतोष गाढवे (वय वर्षे १५) हे दोघे सख्खे भाऊ पठारभागावरील कर्जुले पठार येथील राहाणार होते. ते आपले सख्ख्खे मामा संजय भाऊसाहेब खर्डे ( वय ४० रा. गणेशवाडी, झोळे) यांच्याकडे आले होते. आज रविवारी (ता.17) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गणेशवाडी परिसरात गेले होते. त्या परिसरातील पावसाने भरलेल्या एका खाणीतील  पाण्यात शेळ्या धुत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मयुर व सुरज हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्याच वेळी मामा संजय  खर्डे हे दोन्ही भाच्यांना वाचवण्यासाठी गेले. मात्र मामा व भाच्यांना पोहता येत नसल्याने  त्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. 


घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून औषधोपचारासाठी रुग्णालयात आण्यात आले. मात्र त्या पूर्वीच ते मयत झाले होते. त्यानंतर तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात आण्यात आले. मामा व भाचेंच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी भाऊसाहेब कारभारी खर्डे  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तोडकरी हे करत आहेत. 

Visits: 245 Today: 2 Total: 1420170

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *