प्रभाकर खैरेंची कविता पन्नास-साठ वर्षांपूर्वीचे त्यांचे वर्तमान दाखवते ः प्रा.पवार ज्येष्ठ कवी प्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या-त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो ते शब्दांच्या माध्यमातून कवितेत मांडतो. त्यामुळे प्रभाकर खैरे यांची कविता पन्नास-साठ वर्षांपूर्वीचे त्यांचे वर्तमान दाखवण्याचे काम करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.संतोष पद्माकर पवार यांनी केले.

संगमनेर शहरातील व्यापारी मंडळ सभागृहात आयोजित ज्येष्ठ कवी प्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील व विमल पाटील हे उपस्थित होते. येथील व्यावसायिक राजेंद्र खैरे यांचे पिताश्री व प्रा.डॉ.अनुश्री खैरे यांचे सासरे असलेल्या प्रभाकर खैरे यांनी चार-पाच दशकांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता त्यांच्या नातीला एका वहीत सापडल्या. या कवितांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खैरे परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. वयाच्या 85 व्या वर्षी माझा कवितासंग्रह प्रकाशित होईल असे कधीच वाटले नाही मात्र आजवर जे काही लिहिलं त्याचं चीज झाल्याची भावना प्रभाकर खैरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी प्रभाकर पाटील, प्रा.लक्ष्मण घायवट, प्रा.राजश्री तांबे, विनायक खैरे, प्रा.काळे आदिंची भाषणे झाली. कौटुंबिक स्नेहीजनांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, बालकुमार साहित्य संस्थेचे संदीप वाकचौरे, मराठी अध्यापक संघाचे जिजाबा हासे, दत्ता शेणकर, अनिल ठाकरे, मारुती फापाळे, छाया ढगे, काशिनाथ काळे, मोहन नेहे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.अनुश्री खैरे यांनी केले तर डॉ.संतोष खेडलेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र खैरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Visits: 180 Today: 1 Total: 1986121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *