आढळाचे आवर्तन कालवा सल्लागार समितीच्या निर्णयावर अवलंबून आवर्तनासाठी जलसंपदाकडून लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार

महेश पगारे, अकोले
आढळा खोर्‍यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील सुमारे सोळा ते सतरा गावांना वरदान ठरलेल्या 1060 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या आढळा मध्यम प्रकल्पाची सद्यस्थिती समाधानकारक आहे. परंतु, अद्यापही रब्बी हंगामासाठी कालवा सल्लागार समिती आणि शेतकर्‍यांची मागणी आली नसल्याची माहिती जलसंपदा विभागाने देत मागणी आल्यास जलसंपदा विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे गणोरे शाखेचे शाखा अभियंता अभिषेक पवार आणि चिकणी शाखेचे रजनीकांत कवडे यांनी दिली आहे.

अकोले तालुक्यातील केळी, सांगवी, पाडोशी व बिताका येथून मोठ्या प्रमाणात आढळा धरणात पाण्याची आवक होते. यावर्षी निसर्ग चक्रीवादळाचा अपवाद सोडता मान्सूनने जोरदार बरसात केल्याने धरण ओसंडून वाहिले. त्यात अजूनही काही प्रमाणात आढळा नदी वाहत आहे. याचा लाभक्षेत्राला मोठा फायदा होत असल्याने लाभधारकांत आनंदाचे वातावरण आहे. आजमितीला (शुक्रवार ता.18) धरणाचा पाणीसाठा 1029 दलघफू आहे. यामुळे पुढील हंगामांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी मिळणार आहे. धरणाचे एकूण ओलिताखाली येणारे लाभक्षेत्र 3914 हेक्टर आहे. यामध्ये गणोरे शाखेंतर्गत उजव्या कालव्याद्वारे पुरवठा होणारी वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, हिवरगाव आंबरे, देवठाण, धांदरफळ, जवळे कडलग, वडगाव लांडगा ही आठ गावे मिळून 2422 हेक्टर क्षेत्र येते. तर चिकणी शाखेंतर्गत डाव्या कालव्याद्वारे पुरवठा होणारी देवठाण, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, नळवाडी, चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर, जवळे कडलग, कासारवाडी ही नऊ गावे मिळून 1491 हेक्टर क्षेत्र येते.

मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. यंदा नोव्हेंबरमध्येच लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने आवर्तनाच्या नियोजनाबाबत पत्रव्यवहार केला आहे. अद्यापपावेतो त्यांचा कोणताही प्रतिसाद जलसंपदा विभागाला मिळालेला नाहीये. परंतु, कालवा सल्लागार समिती आणि शेतकर्‍यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय घेऊन आवर्तनाचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मुख्य कालव्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती जलसंपदा विभाग करेल तर पोटचार्‍यांची दुरुस्ती लाभधारक शेतकर्‍यांना करावी लागणार असल्याचे नमूद केले आहे.

लाभक्षेत्रातील सर्व सोळा ते सतरा गावांना जलसंपदा विभागाने आवर्तनाच्या नियोजनाबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. कालवा सल्लागार समिती आणि शेतकर्‍यांची बैठक होऊन जो निर्णय होईल त्यानुसार आवर्तनाचे नियोजन करण्यात येईल. उजव्या व डाव्या दोन्ही मुख्य कालव्यांची स्वच्छता व दुरुस्ती करुन लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभाग अधिकारी व कर्मचार्‍यांसह सज्ज आहे.
– अभिषेक पवार (शाखा अभियंता, गणोरे)
– रजनीकांत कवडे (शाखा अभियंता, चिकणी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *