रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड निघाले सकाळचे संपादक! स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तिनच दिवसांत तपास पूर्ण करीत सर्व आरोपी केले उघड

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
गेल्या सोमवारी (ता.30) पुण्याहून घरी परतत असलेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या रेखा वायकर-जरे यांचा सुप्याजवळील जातेगाव घाटात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन निर्घुन खून केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कारवाई करीत अवघ्या तिनच दिवसांत या हत्याकांडाचा तपास पूर्ण करीत सर्व आरोपींना उघड केले. या बाबत पोलीस अधीक्षकांनी आज दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडाच्या मागे दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ ज.बोठे असल्याचे आता समोर आले असून या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार सोमवारी (ता.30) रेखा भाऊसाहेब जरे (रा.शनीचौक, नगर) या आपली आई सिंधूताई सुखदेव वायकर (रा.पाथर्डी), मुलगा कुणाल व लियमाला माने असे चौघेजण आपल्या सॅन्ट्रो कार (क्र.एम.एच.12/ई.जी.9146) मधून पुणे येथून अहमदनगरच्या दिशेने येत होत्या. यावेळी त्यांची कार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुप्याजवळील जातेगाव घाटात आली असता पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरील (क्र.एम.एच.17/2380) दोघांनी जरे यांची कार थांबवून ‘तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर चालवता कशाला’ असे म्हणत त्यांचे नाव विचारुन त्यांच्याशी वाद घातला व त्याचवेळी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करुन त्यांची निर्घुन हत्या केली. या प्रकरणी त्यांच्या आईच्या फिर्यादीवरुन सुपा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना सूचना करुन तपासाची दिशा दिली. गेल्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता गुन्ह्यातील आरोपी राहुरी व कोल्हार परिसरातील असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार आरोपींचा शोध सुरु केला असता फिरोज राजू शेख (वय 26, रा.संक्रापूर, ता.राहुरी) याला पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा.कडीत फत्तेबाद, ता.श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा.तिसगाव फाटा, कोल्हार) यांची नावे सांगीतली. त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन अटक करण्यात आली.


त्यांना सुपा पोलीस ठाण्यात अटक करुन अधिक चौकशी केली असता सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा.केडगाव) व ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा.प्रवरानगर, ता.राहाता) यांना बुधवारी (ता.2) अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. त्यांच्या तपासातून आता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून या संपूर्ण प्रकरणाच्या मूळाशी दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ ज.बोठे असल्याचे समोर आले आहे. अटकेतील आरोपींनी या हत्याकांडातील मास्टरमाईंडची माहिती देताच स्थानिक गुन्हे शाखेने बोठे यांच्या बालिकाश्रम रस्त्यावरील घरावर छापा घातला मात्र सदर संशयित आरोपी पोलीस पोहोचण्याच्या आधीच पसार झाला होता. या हत्याकांडात राज्यातील एका मोठ्या माध्यम समूहाचा कार्यकारी संपादक असल्याचे समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 342 Today: 4 Total: 1104052

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *