ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हांला देशप्रेम शिकवू नये! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे सडेतोड प्रत्युत्तर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जम्मू-काश्मीरमधील गुपकर डिक्लेरेशनमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हांला देशप्रेम शिकवू नये, अशी बोचरी टीका थोरात यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले पण भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय काही गेली नाही, अशी घणाघाती टीका थोरात यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे असा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे थोरात म्हणाले.

काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हांला देशप्रेम शिकवू नये. महेबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, याचा 52 वर्षे आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत. परंतु, 2017 साली याच महेबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती.

हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का? महेबुबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का?, असा संतप्त सवालही थोरात यांनी केला. काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही, असेही थोरात यांनी शेवटी स्पष्ट केलं आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 30672

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *