‘विकासाचा महामेरू’ गौरव ग्रंथात वास्तवदर्शी मांडणी : ना.भुजबळ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती, निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीपासून ते प्रशासनातील कुशलतेपर्यंत, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचे सुसंगत आणि वास्तवदर्शी मांडणी करताना या सर्व कार्याचा अचूक वेध तरुण, सुसंस्कृत व सुशिक्षित नेतृत्व आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतील ‘विकासाचा महामेरू’ या ग्रंथातून घेण्यात आला असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून व देवळाली प्रवरा येथील पत्रकार गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकासाभिमुख दूरदृष्टी व दैदिप्यमान कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘हॉटेल ट्रायडंट’ येथे पार पडला. या प्रसंगी भुजबळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, बाबासाहेब पाटील, माणिक कोकाटे, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ. शिवाजी गर्जे, आ. आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, आ. काशिनाथ दाते, आ. दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, कोषाध्यक्ष संजय बोरगे उपस्थित होते.

अजितदादा पवार हे फक्त एक कुशल प्रशासक नसून, महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकातील नागरिकांच्या उन्नतीसाठी झटणारे खरे लोकनेते आहेत. ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथात त्यांच्या कार्यशैलीतील शिस्त, पारदर्शकता, नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असून हा ग्रंथ नव्या पिढीला प्रेरणा देईल, असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

Visits: 115 Today: 1 Total: 1419378
