उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभे करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणार : ना.शहा

नायक वृत्तसेवा, लोणी
सहकारी साखर कारखानदारीला बहुउद्देशीय चेहरा मिळवून देण्यासाठी उपपदार्थ निर्मितीला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल. ऊसाबरोबरच मका आणि तांदुळापासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने धोरण घेतले असून, उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभे करणा-या कारखान्यांना केंद्र सरकार अर्थसहाय्य करण्यास तयार असल्याची ग्वाही केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करयात आले. तत्पुर्वी प्रवरानगर येथील डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार आणि सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पद्मश्रींच्या कार्याचा गौरव करुन, भारताच्या सहकार चळवळीतले ते आद्य पुरुष होते. डॉ.विखे पाटील यांच्या सहकार्याने धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीचा इतिहास रचला. एक सहकारी साखर कारखाना निर्माण झाल्याने त्याचा आदर्श घेवून गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्येही सहकार चळवळ विस्तारली गेली.या माध्यमातून तो भाग समृध्द झाला. व्यापा-यांना फायदा होण्याऐवजी सहकारी सहकारी साखर कारखानदारीचा पैसा थेट शेतक-यांच्या खात्यात जावू लागला. सहकार चळवळीची ही किमया सामाजिक विकासासाठी संमृध्द ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचीही भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी करुन, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे सहकाराच्या भूमित दुस-यांदा येणे हा आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यशस्वी केलेले ऑपरेशन सिंदुर आणि त्यानंतर दहशतवाद आणि अर्बन नक्षलवादाच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईला बळ म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून चांदीची गदा भेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना राज्याच्या विकासाचा मंगल कलश आणि ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिबिंब म्हणून बैलगाडीची भेट दिली.

Visits: 59 Today: 3 Total: 1098274
