आरक्षणासाठी भांडणार्या संघटनांमध्ये राज्य सरकारकडून फूट पाडण्याचा प्रयत्न!
आरक्षणासाठी भांडणार्या संघटनांमध्ये राज्य सरकारकडून फूट पाडण्याचा प्रयत्न!
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मराठा आरक्षणावरून राज्य सरकावर निशाणा
नायक वृत्तसेवा, राहाता
‘राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणार्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतयं, हे दुर्देव आहे,’ असे वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी करतानाच मराठा आरक्षणावरून सरकावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी धरसोड झाली, त्याचा परिणाम म्हणजे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. आता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे हे प्रकरण जाणार आहे. परंतु मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन यामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तरच सरकार वटणीवर येईल, असेही ते म्हणाले.

अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विखे यांनी गुरुवारी (ता.29) जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बोलताना विखे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाही. मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमली होती. परंतु या समितीतील सदस्यांना किती गांभीर्य आहे ? कारण ते बैठकांना हजर नव्हते. आरक्षणाच्या बाबतीत सध्या काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, हे त्यांना माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात जे सरकारने विशेष वकिल नेमले आहेत, त्यांना फी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. फी ची तरतूद सरकार करू शकले नाही. सरकार हे वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, त्यांना आरक्षण द्यायचे नाही.

यावेळी कांदा निर्यातबंदी बाबत देखील विखे यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, कांदा निर्यातबंदी उठवणे किंवा लावणे, हे आज धोरण घेतले नाही. शरद पवार यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. केंद्र सरकार याला जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पण पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांच्या काळात कितीवेळा कांदा निर्यातबंदी करावी लागली, याची त्यांना आठवण कोणीतरी करून दिली पाहिजे. सरकारला त्या-त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय करावे लागतात, त्यांना याची कल्पना आहे. त्यामुळे केंद्रावर आरोप करून चालणार नाही. निर्यातबंदी करू नये, ही आमची देखील मागणी होती. शेतकर्यांच्या शेतीमालाला निर्यातबंदी करावी, ही भूमिका नसावी या मताचा मी आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बुधवारी पंकजा मुंडे यांनी कौतुक केले. याबाबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारले असता, राजकीय निर्णय होतात, त्यामध्ये प्रत्येकाची भूमिका असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीगत भूमिकेवर आपण भाष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

