युरिया पासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खरीप हंगामासाठी सरकारने तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा पुरवठा केला आहे. मात्र काही ठिकाणी युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत.

तालुक्यात युरिया खतांचा पुरेसा पुरवठा असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलतांना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सर्व कृषी सेवा केंद्र, सहकारी संस्था यांचा समन्वय साधून युरियाचा साठा निश्चित करा, शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाने युरिया खत मिळण्यास काही अडचणी येत असेल तर त्यावर तात्काळ उपाययोजना करा आणि शेतकऱ्यांना युरिया खत तातडीने उपलब्ध करून द्यावे असेही ते म्हणाले. कृषी सेवा केंद्र चालक अगर सहकारी संस्था युरिया असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश आ. खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आ.खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले होते.त्यातील २०५ मेट्रिक टन युरिया खताचे संपूर्ण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी युरिया टंचाई असल्याच्या विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. मागणी नुसार पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठे अडवणूक होत असेल तर संपर्क कार्यालयात कळवावे असे आवाहन
आ.अमोल खताळ यांनी केले आहे.

Visits: 97 Today: 2 Total: 1104117
